Rahul Gandhi, Priyanka Gandhi Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : अमेठी-रायबरेलीसाठी काँग्रेसची खास रणनीती; दोन माजी मुख्यमंत्र्यांवर मोठी जबाबदारी

Rajanand More

Uttar Pradesh News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (ता. 7) होणार आहे. तर पुढील टप्प्यांतील प्रचारही शिगेला पोहचला आहे. काँग्रेससाठी पुढील टप्प्यांत रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघात होणारी निवडणूक अग्निपरीक्षा ठरणार आहे. यावेळी रायबरेलीतून राहुल गांधी तर अमेठीतून के. एल शर्मा मैदानात आहेत. त्यांच्या विजयाची जबाबदारी प्रियांका गांधींवर सोपवण्यात आली असून त्यांच्या मदतीला दोन मुख्यमंत्र्यांवरही मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघात भाजप नेत्या स्मृती इराणींनी राहुल गांधींचा (Rahul Gandhi) पराभव केला. तर आता या निवडणुकीत रायबरेली हा गांधींचा गडही ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर काँग्रेसला (Congress) अमेठी परत मिळवण्यासाठी आणि रायबरेली शाबूत ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने पक्षाने तयारी केली आहे. (Latest Political News)

प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) सोमवारी जवळपास 40 प्रचारकांना सोबत घेऊन रायबरेलीमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांना अमेठीतही शर्मा यांच्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. काँगेसने त्यासाठी छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर रायबरेलीची तर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर अमेठीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बघेल यांना वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून तर गेहलोत यांना निवडणूक व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल गांधी हे देशभरात प्रचारसभा घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात लक्ष घालण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी विश्वासू नेते गेहलोत यांच्यावर सोपवली आहे.

प्रियांका गांधी यांनी सोमवारी रायबरेलीमध्ये आल्यानंतर पक्षाच्या जिल्हा आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली. पुढील काही दिवस त्यांचा मुक्काम रायबरेली आणि अमेठीमध्येच असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत त्यांनी देशभरात सभा घेतल्या, रोड शो केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला दिलेल्या प्रत्युत्तरामुळे त्यांना विविध मतदारसंघात सभेसाठी मागणी वाढत आहे. पण आता त्या या दोन मतदारसंघातच अडकून पडणार असल्याचे स्पष्ट दिसते.

अमेठीत पुन्हा विजय खेचून आणण्यासाठी प्रियांका यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढत पुन्हा गांधी कुटुंबाचा गड ताब्यात घेण्याची महत्वाची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे. यावेळी पुन्हा स्मृती इराणी मैदानात असताना काँग्रेससाठी ही लढाई सोपी असणार नाही. त्यामुळे आता दोन्ही मतदारसंघात काँग्रेसला मतदार कसा प्रतिसाद देतात, हे चार जूनलाच समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT