India Alliance  Google
देश

India Alliance : ‘इंडिया’तील जागावाटपावर जयराम रमेश यांचे सूचक वक्तव्य; म्हणाले, तोंड बंद आणि...

Rajanand More

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी ’इंडिया’ आघाडीने आता कंबर कसली आहे. जागावाटपाबाबत तर्कवितर्क लढविले जात असले तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. तोंड बंद ठेऊनच आम्ही जागा वाटपाची चर्चा पुढे सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आघाडीतील जागावाटपावरून नेत्यांकडून वेगवेगळी वक्तव्य येत असल्याने त्यांनी सर्वांचेच कान उपटले आहेत का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीच्या (India Alliance) बैठकीत जागावाटपाबाबत काहीच चर्चा झाली नसल्याचा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. तर राज्यपातळीवर याबाबत चर्चा होईल, असे काही नेत्यांकडून सांगितले जात आह. त्यामुळे आघाडीत ताळमेळ नसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra) अजूनही जागावाटपावर आघाडीतील नेत्यांकडून ठोस माहिती दिली जात नाही. त्यामुळे आघाडीची चर्चा पुढे जाणार का, अशी चर्चा सुरू आहे.

या सर्व चर्चांवर जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी सूचक वक्तव्य केले आहे. मोकळे मन आणि बंद तोडांनेच आमच्या जागावाटपाची चर्चा पुढे सुरू राहील, असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे जागावाटपाबाबत आघाडीच्या चर्चा बंद दाराआड सुरू असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. आघाडीमध्ये प्रामुख्याने प्रादेशिक पक्षांचाच भरणा आहे. परिणामी, राज्यस्तरीय नेत्यांकडूनच आघाडीतील जागावाटपाचे सूत्र अंतिम केले जाणार, हे स्पष्ट आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, काँग्रेसने (Congress) नुकत्याच केलेल्या फेरबदलामध्ये प्रियंका गांधी यांच्याकडून उत्तर प्रदेशचे प्रभारीपद काढून घेण्यात आले आहे. त्यावर जयराम रमेश म्हणाले, प्रियंका गांधी पक्षाच्या सरचिटणीस आहे. तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्त्वाची असेल.

है तैयार हम!

नागपूरमध्ये 28 डिसेंबर रोजी काँग्रेसची मेगा रॅली होणार आहे. त्याला ‘है तैयार हम’ असे नाव देण्यात आले आहे. या सभेत काँग्रेस लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे, अशी माहिती जयराम रमेश यांनी दिली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी यांनीही 'इंडिया' आघाडीच्या जागावाटपाबाबत आपण तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. आघाडी एकत्र आणि मजबूत राहायला हवी. निवडणुकीत विजयासाठी काँग्रेस शक्य ते सर्वकाही करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT