Narendra Modi, Prashant Kishor, Rahul Gandhi  Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : भाजप, काँग्रेसचा दावा ठरणार फोल; प्रशांत किशोर यांनी स्पष्टच सांगितले 'इतक्या' जागा मिळणार

Sachin Waghmare

Dehlli News : आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने भाजप व काँग्रेस आघाडीने जोरदार तयारी केली आहे. दोन्ही आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असल्याची चर्चा आहे. भाजप व काँग्रेसकडून या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले असले तरी या दोन्ही पक्षाला हे उद्दिष्ट गाठता येणार नसल्याचे सांगत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दोन्ही पक्षाने केलेल्या दाव्यातील हवाच काढली आहे.

जन सुराज्य संघटनेचे संस्थापक व निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी 100 जागांचा आकडा पार करणे फार कठीण असल्याचे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रशांत किशोर यांनी भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत 370 जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाही, परंतु या वेळी पश्चिम बंगालमध्येही चांगली कामगिरी करण्याची संधी भाजपला असल्याचे स्पष्ट केले. (Loksabha Election 2024 News)

या निवडणुकीत काँग्रेस 100 चा टप्पा ओलांडणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सध्याच्या जागांमध्ये कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता दिसत नाही, असेही प्रशांत किशोर (Prashant Kishor) म्हणाले.

काँग्रेसच्या (Congress) जागांची संख्या 50-55 झाली तरी देशाचे राजकारण बदलणार नाही. काँग्रेसच्या निवडणुकीच्या निकालात मला कोणताही सकारात्मक बदल दिसत नाही. मोठ्या बदलांसाठी काँग्रेसला 100 चा आकडा पार करावा लागणार आहे. काँग्रेस 100 चा आकडा पार करेल, असे वाटत नाही. हे लक्ष्य पार करणे आजच्या तारखेत तर खूप अवघड वाटत असल्याचे किशोर म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपच्या 370 जागा जिंकण्याच्या लक्ष्याबाबत बोलताना किशोर म्हणाले की, भाजपने आपल्या कार्यकर्त्यांसाठी 370 चे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे मतदारांनी कलम 370 चे हे उद्दिष्ट खरे मानू नये. प्रत्येक नेत्याला ध्येय निश्चित करण्याचा अधिकार आहे. जर त्यांनी हे साध्य केले तर ते खूप चांगले आहे, जर ते शक्य नसेल तर पक्षाने आपली चूक मान्य करण्याइतपत नम्रपणे वागले पाहिजे.

2014 नंतर पार पडलेल्या 8-9 निवडणुकांमध्ये भाजपला (Bjp) निर्धारित लक्ष्य साध्य करता आले नाही. किशोर म्हणाले, भाजपला एकट्याने 370 जागा मिळू शकत नाहीत, असे मी म्हणू शकतो. मी ही शक्यता जवळजवळ शून्य मानतो. असे झाले तर मला खूप आश्चर्य वाटेल. सत्ताधारी पक्षाचे निश्चितच थोडेफार नुकसान होईल, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

R

SCROLL FOR NEXT