Rahul Gandhi, Narendra Modi Sarkarnama
देश

Lok Sabha Election Result : लोकसभेच्या निकालातून भाजपसह काँग्रेसलाही रेड अलर्ट!

Rajanand More

New Delhi : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात एनडीएची सत्ता आली. तर इंडिया आघाडीलाही अनपेक्षित यश मिळाले. मात्र, या निवडणुकीत 2019 च्या तुलनेत विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांची टक्केवारी कमी झाल्याचे समोर आले आहे.

मोजक्याच उमेदवारांना संबंधित मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानाच्या 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवण्यात यश आले आहे. 2019 च्या तुलनेत विजयी व पराभूत उमेदवारांमधील मतांचा फरक कमी झाल्याने हा सर्वच पक्षांसाठी रेड अलर्ट असल्याचे मानले जात आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेने केलेल्या अहवालामध्ये हे समोर आले आहे. त्यानुसार 2019 मध्ये विजयी उमेदवारांना एकूण मतदानापैकी सरासरी 52.65 टक्के मते मिळाली होती. 2024 मध्ये हे प्रमाण 50.58 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

नोंदणीकृत मतांच्या तुलनेत मताधिक्याचे प्रमाणे 2019 मध्ये 35.46 टक्के एवढे होते. हे प्रमाणही यावेळी सुमारे दोन टक्क्यांनी कमी झाले आहे. मागील निवडणुकीत एकूण विजयी उमेदवारांपैकी 51 टक्के उमेदवारांना 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. यावेळी हे प्रमाण 49 टक्के एवढे म्हणजे 263 विजयी उमेदवार आहेत.

एकूण मतदानापैकी 279 उमेदवारांना जवळपास 51 टक्के मते मिळाली आहेत. भाजपच्या उमेदवारांमध्ये हे प्रमाण केवळ 31 टक्के आहे. विजयी 239 उमेदवारांपैकी 75 उमेदवारांनाच 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या 99 विजयी उमेदवारांपैकी तब्बल 57 उमेदवारांना 50 टक्क्यांहून कमी मते मिळाली आहेत.

प्रादेशिक पक्षांच्या अनेक उमेदवारांना 50 टक्क्यांहून कमी मते मिळाली आहे. उत्तर प्रदेशात भाजपला धूळ चारलेल्या समाजवादी पक्षाचे 37 पैकी 32 उमेदवारांना 50 टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली आहेत. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचीही अशीच अवस्था आहे. टीएमसीचे 29 पैकी 21 तर तमिळनाडूतील डीएमकेचे 22 पैकी 14 असे उमेदवार आहेत.

भाजप, काँग्रेससाठी चिंता

एकूण विजयी उमेदवारांमध्ये सर्वाधिक कमी म्हणजे 10 टक्क्यांहून कमी मताधिक्य असलेल्या उमेदवारांमध्ये काँग्रेसचे उमेदवार अधिक आहेत. त्याखालोखाल समाजवादी पक्ष, तृणमूल आणि डीएमके या इंडिया आघाडीतील पक्षांचा समावेश आहे. भाजपच्याही शंभर उमेदवारांना 10 टक्क्यांहून कमी मताधिक्य मिळाले आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत या मतदारसंघात काँटे की टक्कर होऊ शकते.  

भाजपच्या खासदारांची संख्या कमी झाली असली तरी भाजपच्या उमेदवारांना मिळालेली मते इतर पक्षांच्या तुलनेत अधिक आहे. 50 टक्क्यांहून अधिक मते मिळालेल्या पहिल्या पाच उमेदवारांमध्ये भाजपचे खासदार आहेत. त्यामध्ये शिवराज सिंह चौहान, चंद्रकांत पाटील, अमित शाह, विप्लव कुमार देव आणि शंकर ललवाणी यांचा समावेश आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT