Bharat Jodo Nyay Yatra Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : सस्पेन्स संपला! उत्तरेत ‘हे’ दोन नेतेच देणार काँग्रेसला ‘न्याय’...

Rajanand More

Bihar News : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसह काँग्रेस व इतर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्रित इंडिया आघाडीचा घाट घातला, पण एकीकडे काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असताना अनेक मित्र साथ सोडून जात आहेत. प्रामुख्याने काँग्रेसला उत्तरेकडील राज्यांमध्ये भाजपचे आव्हान पेलावे लागणार आहे. तिथेही धक्के बसत असताना दोन बड्या नेत्यांनी मात्र काहीसा दिलासा दिला आहे. (Lok Sabha Election 2024)

जागावाटपावरून ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये तर आपने पंजाबसह दिल्लीतही काँग्रेसशी फारकत घेतली आहे. फारुख अब्दुल्लांनीही एकलो चलोची भूमिका घेतल्याने बिहार आणि उत्तर प्रदेशात काय होणार, याबाबत उत्सुकता वाढली होती. आज याबाबतचा सस्पेन्स संपला. काँग्रेसची (Congress) भारत जोडो न्याय यात्रा आज बिहारमधून उत्तर प्रदेशात जाणार आहे. मागील महिन्यांत बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमारांनी (Nitish Kumar) आघाडीतून बाहेर पडत भाजपला हात दिला. त्यांनी बहुमत चाचणीही जिंकली, तर दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली न्याय यात्रा आज बिहारमधून उत्तर प्रदेशात जाणार आहे. या वेळी अखेरच्या टप्प्यात इंडिया आघाडीसाठी सकारात्मक चित्र पाहायला मिळाले. तेजस्वी यादव यांनी थेट राहुल गांधींचे सारथी बनल्याचे दिसले. बिहारमधील सासाराममध्ये तेजस्वींनी यात्रेत सहभागी होत राहुल गांधींचे कौतुकही केले. सभेतही व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बिहारमध्ये काँग्रेसला तेजस्वी यादव यांची पक्की साथ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सायंकाळी न्याय यात्रा उत्तर प्रदेशाची सीमा ओलांडणार आहे. या यात्रेत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादवही सहभागी होणार नसल्याचे त्यांनीच सांगितले आहे. या राज्यात जयंत चौधरींनीही भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे, पण अखिलेश आजही इंडियासोबत असल्याने काँग्रेसचे बळ वाढले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी बिहार आणि उत्तर प्रदेश ही दोन्ही राज्ये भाजपसह विरोधकांसाठीही महत्त्वाची आहे. सध्यातरी एनडीएचे पारडे जड वाटत असले तरी इंडिया आघाडी एकसंध राहिल्यास काही प्रमाणात भाजपला टक्कर देऊ शकते. त्यामुळे अखिलेश आणि तेजस्वी यांची साथ राहुल यांच्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT