Lok Sabha Election Delhi News Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : आयत्यावेळी भाजपशी केलेला शेकहँड 'या' नेत्यांना भोवला !

सरकारनामा ब्यूरो

New Delhi News : गेल्या काही वर्षांपासून एका पक्षात असताना लोकसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत निवडणूक लढविणाऱ्यांना मतदारांनी नाकारले आहे. लोकसभा निवडणुकीत अशा पक्षबदलू नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये काँग्रेससह इतर पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपत गेलेल्या रवनीत सिंग बिट्टू हे लुधियानाचे काँग्रेसचे खासदार होते. निवडणुकीच्या अगोदर काही महिने त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत लोकसभेची उमेदवारी मिळविली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे बिट्टू यांची ओळख होते. त्यांनी निवडणुकीच्या अगोदर केलेला पक्ष बदल हा मतदारांना रुचला नाही.निवडणुकीत मतदारांनी त्यांना नाकारत पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांच्या बाजुने आपला कौल दिला. अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी खासदार रवनीत सिंग बिट्टू यांचा निवडणुकीत पराभव केला.

पंजाबमधील पतियाळा येथील काँग्रेसच्या (Congress) खासदार परनीत कौर सिंग या सुद्धा निवडणुकीपूर्वी भाजपत प्रवेश केला. त्यांना भाजपने पतियाळामधून उमेदवारी दिली. परंतू त्यांचा देखील काँग्रेसचेच उमेदवार व पतियाळातील डॉ.धर्मवीर गांधी यांनी दारूण पराभव केला. पंजाबमधील जालंधरचे आम आदमी पक्षाचे खासदार सुशीलकुमार रिंकू यांनी देखील निवडणुकीपूर्वी आपपासून फारकत घेत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता.परंतू लोकसभा निवडणुकीत त्यांनाही मतदारांनी जागा दाखवून दिली. त्यांना देखील भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी त्यांचा पराभव केला.

उत्तरप्रदेशातील बहुजन समाज पार्टीचे आंबेडकरनगर मतदारसंघाचे खासदार रितेश पांडे यांनी निवडणुकीपूर्वी भाजपत (Bjp) प्रवेश केला. त्यांना भाजपने उमेदवारी दिली. परंतू त्यांचा सपचे नेते लालजी वर्मा यांनी पराभव केला.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी देखील निवडणुकीपूर्वी भाजपत प्रवेश केला होता. त्यांचा पराभव काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी केला. यामुळे पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचे राणा यांचे स्वप्न भंग पावले.

काँग्रेस,आप असा प्रवेश करून भाजपात दाखल झालेले अशोक तंवर यांचा हरियानातील सिरसा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. त्यांचा पराभव काँग्रेसच्या नेत्या शैलजाकुमारी यांनी पराभव केला. याबरोबरच राजस्थानमधील नागौरमध्ये भाजपच्या उमेदवार ज्योती मिर्धा यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या निवडणुकीपूर्वीच त्या देखील काँग्रेसमधून भाजपत दाखल झाल्या होत्या. त्यांचा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे हनुमान बेनीवाल यांनी पराभव केला.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT