Jammu and Kashmir Loksabha Election
Jammu and Kashmir Loksabha Election Sarkarnama
देश

Loksabha Election 2024 : जम्मूत 370 हटविल्यानंतरचा लोकसभेचा कौल कुणाच्या बाजूने..?

सरकारनामा ब्युुरो

Jammu Kashmir BJP News : 2019 मध्ये राज्यघटनेतील जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हटविल्यानंतर होणाऱ्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत लोकांचा कौल कुणाच्या बाजूने राहील, हे महत्वाचे आहे. गेल्या 10 वर्षांपासून भाजपचा उमेदवार या मतदारसंघातून बाजी मारत असला तरी काँग्रेसची स्थिती या मतदारसंघात वाईट नाही. 1962 पासून झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने या मतदारसंघात 9 वेळा विजय संपादन केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे जुगलकिशोर शर्मा तिसऱ्यांदा हॅटट्रीक करतात काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2019 मध्ये जम्मू व काश्मीरचा विशेष दर्जा काढून केंद्रशासित प्रदेश केला आहे. तेव्हापासून विधानसभेच्या निवडणुका सुद्धा झालेल्या नाहीत. जनमताचा कौलाची परीक्षा झालेली नाही. 370 कलम हटविल्यानंतर जम्मूचा विकास होईल, विस्थापित झालेले काश्मीरी पंडीत पुन्हा परत येतील, रोजगार वाढेल, या घोषणांचे परिणाम जमिनीवर दिसत नाही. यामुळे भाजपच्या विरोधात जम्मूत सुद्धा नाराजी आहे.

जम्मूमध्ये सरकारच्या विरोधात होत असलेले निदर्शने हे या भागातील लोकांमध्ये असलेला असंतोष स्पष्ट करीत आहे. त्याचप्रमाणे यावेळी काश्मीरी पंडीताची एक संघटना असलेल्या एकम सनातन भारत दलाचे अॅड. अंकुर शर्मा यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने भाजपसाठी डोकेदुखी वाढली आहे.

2014 पासून दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये हिंदू मतदारांच्या प्रभाव असलेल्या या मतदारसंघात भाजपचे जुगलकिशोर शर्मा निवडून आलेले आहेत. या मतदारसंघातील सांबा व जम्मू भागात भाजपचे वर्चस्व अधिक आहे. तिसर्यांदा भाजपने जुगलकिशोर शर्मा यांनाच उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने रमण भल्ला यांना उमेदवारी दिली आहे. 2004 व 2009 मध्ये काँग्रेसने या मतदारसंघात विजय मिळविला होता.

काँग्रेसचाही या जम्मूत मतदारांचा निश्चित टक्का आहे. काश्मीरी पंडीतांचा अखिल भारतीय काश्मीरी हिंदू फोरम (एबीकेएचएफ) नावाची संघटना नुकतीच काँग्रेसमध्ये विलीन झाली. गेल्या 25 वर्षांपासून हा गट काश्मीरी पंडीतांचे प्रश्न मांडत होते. गेल्या 10 वर्षात काश्मीरी पंडीतांसाठी भाजपच्या सरकारने काहीही केले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यामुळे डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात काश्मीरी पंडीतांसाठी अधिक विकासाचे कार्य झाल्याचा दावा केला होता. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसची मतांच्या टक्केवारीत वाढ झाली होती. यावेळी नॅशनल कॉन्फरंस व पीडीपी या पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने या पार्श्वभूमीवर भाजपलाही ही जागा तेवढी सोपी राहिलेली नाही. त्यामुळेच 370 कलम हटविल्यानंतर जनमताचा कौल कुणाच्या बाजूने हे या निवडणुकीने स्पष्ट होणार आहे.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT