देश

Madhya Pradesh Election Result 2023 : मध्य प्रदेशात पुन्हा उमललं कमळ; शिवराजसिंह चौहानांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Mayur Ratnaparkhe

MP Election Result 2023 : देशभरात आज चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत आहेत. यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपने मुसंडी मारल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशात एकूण 230 जागांपैकी भाजप वृत्त लिहीपर्यंत 163 जागांवर आघाडीवर होती, तर काँग्रेस केवळ 65 जागांवर दिसून आली.

यामुळे मध्य प्रदेशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेत येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजप नेते तसेच कार्यकर्त्यांकडून जल्लोषही सुरू करण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या निवडणूक निकालावर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणतात, "मध्य प्रदेशातील भाजपचा विजय हा 'डबल इंजिन सरकार' आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा विजय आहे. भाजपने मध्य प्रदेशात 'लाडली लक्ष्मी'पासून 'लाडली बहना'पर्यंतचा जो अद्भूत प्रवास केला आहे, त्या प्रवासाचे हे फळ आहे. आमच्या सरकारने गरीब आणि शेतकऱ्यांसाठी जे काम केले, त्याला जनतेने डोक्यावर घेतले.''

याचबरोबर '' 'भारत माता की जय, जनता जनार्दन की जय' आज मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत आणि मला विश्वास आहे, की जनतेच्या आशीर्वादाने आणि नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सरकारची पुन्हा स्थापना होईल. पुन्हा पूर्ण बहुमताने सरकार येणार आहे. भाजपच्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन,'' असंही शिवराज सिंह चौहान म्हणाले आहेत.

याशिवाय, छत्तीसगडमध्येही भाजपला यश मिळताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेते रमणसिंह म्हणाले, ''मी पक्षाकडे कधीही काहीही मागितले नाही. मला जी जबाबदारी देण्यात आली ती मी पार पाडली. माझ्याकडे कुठली जबाबदारी द्यायची हे पक्षच ठरवेल. मतमोजणीच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल मागे पडले असल्याने जनमत त्यांच्या विरोधात आहे हे दिसून येते.''

याशिवाय, तेलंगणात काँग्रेसने सत्ताधारी केसीआर यांच्या बीआरएस पक्षाला धक्का देत सत्तास्थापनेच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केली आहे. यावर काँग्रेसचे खासदार उत्तमकुमार रेड्डी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे., ''गांधी परिवाराबद्दल तेलंगणाच्या जनतेच्या मनात असलेल्या प्रेमाचा हा विजय आहे. २०१४ आणि २०१८ मध्ये आम्ही चुका केल्या होत्या. या वेळी मात्र आम्ही चुका दुरुस्त केल्या. त्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला, असं त्यांनी म्हटलं आहे.

याशिवाय, ''तेलंगणामध्ये भाजपचे आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत. सध्याचे राजकारणच असे आहे की, कधी आमचे आमदार त्यांच्याकडे जातात तर कधी त्यांचे आमच्याकडे येतात,'' अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या रेणुका चौधऱी यांनी दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT