<div class="paragraphs"><p>Mahant Ram Sunder Das, Kalicharan Maharaj</p></div>

Mahant Ram Sunder Das, Kalicharan Maharaj

 

Sarkarnama

देश

गांधीजींचा अपमान करणाऱ्या महाराजाला महंतांनी झापले अन् थेट टाकला बहिष्कार

सरकारनामा ब्युरो

रायपुर : छत्तीसगढची राजधानी रायपुर येथे आयोजित दोन दिवसीय धर्म संसदेत (Dharma Sansad) मोठा वाद पाहायला मिळाला. रविवारी समारोप झालेल्या संसदेत महाराष्ट्रातून आलेल्या कालीचरण महाराजांनी (Kalicharan Maharaj) महात्मा गांधींविषयी अपशब्द वापरले. त्यावरून जोरदार वाद निर्माण झाला आहे. पण याच धर्म संसदेत एका महंतांनी या महाराजासह त्यांच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवणाऱ्यांनाही स्टेजवरूनच झापले. तसेच त्यांनी धर्म संसदेवर बहिष्कार टाकत तिथून निघून गेले.

कालीचरण महाराज यांनी संसदेत बोलताना गांधीविषयी (Mahatma Gandhi) अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गांधींविषयी अपशब्द वापरून महाराजांनी महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे याने हत्या केल्याचे सांगत गोडसेचे कौतूकही केले. त्यानंतर बोलण्यासाठी आलेले महंत रामसुंदर दास (Ram Sunder Das) हे सर्वांवरच भडकले.

यावेळी बोलताना महंत दास म्हणाले की, महात्मा गांधींविषयी धर्म संसदेच्या मंचावरून जे म्हटलं आणि त्यावरून तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, ते योग्य आहे का? महात्मा गांधी खरंच गद्दार होते का? टीव्हीचे रेकॉर्डिंग आहे. तुम्ही सगळ्यांनी पहा. हेच शब्द म्हटले होते. तुम्ही टाळ्या, थाळ्या वाजवल्या होत्या. 1947 च्या त्या घटनेची आठवण करा. कोणत्या परिस्थितीत भारताला स्वातंत्र्य मिळालं. महात्मा गांधींनी त्यासाठी खूपकाही केलं. त्यांच्याविषयी धर्म संसदेच्या मंचावरून असं वक्तव्य, योग्य नाही. मी तुम्ही सर्वांची माफी मागतो आणि या धर्म संसदेपासून वेगळा होतो, असं म्हणत त्यांनी संसदेतून काढता पाय घेतला.

महंत रामसुंदर दास हे छत्तीसगढ गौसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनीही धर्म संसदेच्या समारोपाच्या कार्यक्रमातून काढता पाय घेतल्याचे समजते. कालीचरण महाराजांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री त्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेसचे नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनीही ट्विटरवर व्हिडीओ टाकत त्याचा निषेध केला आहे.

हा भगवाधारी फ्रॉड राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना उघडपणे शिव्या देत आहे. त्याता लगेच तुरुंगात टाकायला हवे. गांधीविषयी वैचारिक मतभेद असू शकतील, पण त्यांचा अपमान करण्याचा अधिकार कुणालाच नाही, असं निरूपम यांनी म्हटलं आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनीही ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

नरेंद्र मोदीजी, तुम्ही हा देश कसा बनवला. महात्मा गांधींना शिव्या दिल्या जात आहेत. समोर बसलेले लोक टाळ्या वाजवत आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. हीच खरी महात्मा गांधींना श्रध्दांजली ठरेल, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनीही यावर ट्विट केले आहे. सत्य, अहिंसेला खोटेपणा आणि हिंसा करणारे कधीही रहवू शकत नाहीत. बापू, हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, असं मलिक यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT