Basavraj Bommai
Basavraj Bommai Sarkarnama
देश

Maharashtra-Karnataka Border Dispute : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची फुशारकी : म्हणे ‘महाराष्ट्राची याचिका सुप्रीम कोर्टात टिकणार नाही..’

सरकारनामा ब्यूरो

बंगळूर : कर्नाटक (Karnataka) आणि महाराष्ट्र (Maharashtra) यांच्यातील सीमावादाबाबत कर्नाटकाची भूमिका स्पष्ट असून, ती घटनात्मक आणि कायदेशीर असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी गुरुवारी केला. महाराष्ट्राच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) विचार करणार नाही, अशी फुशारकीही बोम्मई यांनी या वेळी मारली. (Maharashtra's plea in Supreme Court will not survive : Basavaraj Bommai)

सीमावादाच्या संदर्भात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. त्याबाबत कर्नाटकाची भूमिका स्पष्ट आहे. महाराष्ट्राच्या याचिकेवर न्यायालय विचार करणार नाही. आमची भूमिका घटनात्मक आणि कायदेशीर आहे. या सर्व बाबी न्यायालयात मांडण्याची तयारी आमच्या वकिलांनी केली आहे.’’

गेल्या अनेक दशकांपासून संघर्षाचे कारण बनलेल्या कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादाबाबत महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, या संदर्भातील याचिकेवर सुनावणी होणार आहे. सीमेचा वाद सोडवण्याचे अधिकार न्यायालयाला आहेत की नाही, याबाबत अंतिम निर्णय जाहीर होणे बाकी आहे.

दोन न्यायमूर्तीं बदलले

सीमावादावरील सुनावणी न्यायमूर्ती के. एम. जोसेफ, न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रह्मण्यम आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नगररत्न यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर बुधवारी (ता. ३० नोव्हेंबर) होणार होती, पण केवळ सुनावणी पुढे ढकलण्यात आली नाही, तर याचिकेवर सुनावणी घेणार असलेल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठातील दोन न्यायाधीशही बदलण्यात आले. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय हे न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नगररत्न यांच्या जागी काम पाहतील. न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ असेल.

बंगळूरमध्ये केंगाल हनुमंतय्या यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘भाजप दंगलखोरांना आणि गुंडाना संधी देत ​​नाही. आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. भाजप हा तत्त्वांवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे.’’

नुकत्याच झालेल्या भाजप खासदारांच्या कार्यक्रमात कुख्यात गुंड सायलेंट सुनील हा व्यासपीठावर उपस्थित होता. विल्सन गार्डन नाग हे बुधवारी (ता. ३०) मंत्री सोमण्णा यांच्या निवासस्थानी आले होते आणि त्याचीही चर्चा होत आहे. बंगळूरचे अनेक गुंड हे भाजप नेत्यांच्या संपर्कात येत आहेत, त्यावर विरोधी पक्ष काँग्रेसने भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT