Congress Sarkarnama
देश

MLAs Disqualification Case : काँग्रेसच्या सहा बंडखोरांची आमदारकी रद्द; राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग भोवले

Rajanand More

Himachal Pradesh News : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर हिमाचल प्रदेशात मोठी राजकीय उलथापालथ सुरूच आहे. निवडणुकीत पक्षाचा व्हीप डावलून भाजपच्या उमेदवाराला काँग्रेसच्या सहा आमदारांनी मतदान केले होते. त्यानंतर काँग्रेसचे सरकार कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला अन् आज विधानसभा अध्यक्षांनी सर्व सहा आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत अपात्र (MLAs Disqualification Case) घोषित केले.

विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) कुलदीप सिंह पठानियन यांनी आज ही घोषणा केली. सहा जणांविरोधात काल काँग्रेसकडून अध्यक्षांकडे अपात्र करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. काल त्यावर अध्यक्षांकडे सुनावणीही झाली. आज लगेच निकालही जाहीर करण्यात आला आहे.

मीडियाशी बोलताना पठानियन यांनी सांगितले की, सहा आमदार काँग्रेसच्या (Congress) चिन्हावर निवडणूक ळडले होते. त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायदा लागू होतो. त्याअंतर्गत हिमाचल प्रदेश विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे काँग्रेसचे संख्याबळ 40 वरून आता 34 पर्यंत खाली आले आहे. तसेच एकूण सदस्य संख्याही 68 वरून 62 पर्यंत खाली आल्याने आता बहुमताचा आकडाही 32 वर आला. परिणामी सध्यातरी काँग्रेसकडे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ आहे. मात्र, मंत्री विक्रमादित्य सिंह (Vikramaditya Singh) यांनी काल मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याने अजूनही संकट संपलेले नाही.

काल विधानसभेत भाजपच्या (BJP) 15 आमदारांना निलंबित करण्यात आले होते. या आमदारांकडून बहुमत चाचणीची मागणी केली जात होती. त्यानंतर भाजपच्या इतर दहा आमदारांनीही सभात्याग केला. त्यामुळे सरकारला अर्थसंकल्प मंजूर करण्यात अडचण आली नाही. अन्यथा अर्थसंकल्प मंजूरीवेळीच सरकारकडे बहुमत नसल्याचे स्पष्ट होईल, असा दावा भाजपकडून केला जात होता.

दरम्यान, मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू (Sukhvinder Singh SUkhu) हे राजीनामा देऊ शकतात, अशी जोरदार चर्चा हिमाचल प्रदेशमध्ये आहे. त्यांच्याजागी माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या गटातील नेत्याकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. विक्रमादित्य सिंह हे वीरभद्र सिंह यांचे पुत्र आहेत. राज्यात सुक्खू आणि सिंह यांच्या गटामध्ये नेहमीच कुरघोडीचे राजकारण सुरू असते. त्यातून काँग्रेसचे सरकारच अडचणी आल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT