Sanjay Raut, Chandrakant Patil
Sanjay Raut, Chandrakant Patil sarkarnama
देश

चंद्रकांतदादांची प्रकृती नीट राहण्यासाठी मी उत्तर देणार नाही..त्यांची विधानं नैराश्यातून!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : ''कॉग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना राजकीय घडामोडींबाबत प्रथमच भेटणार आहे. त्यांनी भेटीची इच्छा व्यक्त केली होती. या भेटीबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा झाली आहे. विरोधकांची मोट बांधताना गटतट असता कामा नये,'' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (mp Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

संजय राऊत यांनी मंगळवारी कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. त्यानंतर आज राऊत हे प्रियांका गांधी यांची सांयकाळी भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते. ''मी पक्षाचा शिवसैनिक आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानेच काम करतो. पण यूपीए प्रश्नी उध्दव ठाकरे हे लवकरच बोलतील,'' असे राऊत म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार व राऊतांवर केलेल्या आरोपांबाबत विचारले असता राऊत म्हणाले, ''चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे विधान गंभीरपणे घेऊ नये. ते नैराश्यातून अशी विधानं करीत असतात. त्यांची प्रकृती नीट राहावी, म्हणून मी त्यांच्या आरोपांना उत्तर देणार नाही. सध्या विरोधी पक्षांची प्रकृती खालावली आहे. त्यांची प्रकृती नीट राहावी, राज्यातील जनतेची प्रकृती नीट राहावी , म्हणून मी उत्तर देणार नाही,''

''ज्यांनी आमच्या जीवावर अठरा खासदार निवडून आणलेत ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्न बघत आहेत. देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं. गेल्या दोन वर्षात एकदाही मंत्रालयात न गेलेल्यांनी वेगवेगळ्या वल्गणा करु नयेत अशी खोचक टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साताऱ्यात फलटण येथे बोलताना केली. शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात,'' असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला होता. त्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

''महाराष्ट्रात कुणी कुणाला खाद्यांवर वाढवलं हे सर्वांना माहित आहे,'' असा टोमणा राऊतांनी भाजपला लगावला. ''महाराष्ट्रात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. सर्वपक्ष मिळून आणि किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर समन्वय साधत काम करत आहेत. महाराष्ट्रातील महाविका आघाडीचा प्रयोग हा 'मिनी यूपीए'चाच प्रयोग आहे,'' असे संजय राऊत यांनी मंगळवारी सांगितले.

''महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत सहभागी झालेला पक्ष आहे. समान मुद्द्यावर आम्ही सरकार चालवत आहोत. सरकार उत्तम चाललेले आहे. तिन्ही पक्षामध्ये संवाद असावा आम्हाला वाटते म्हणून दिल्लीत असताना चर्चा करतो. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर, देशातील घडामोडींवर चर्चा करतो. पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. आम्ही गोव्यात निवडणूक लढवत आहोत. उत्तर प्रदेश निवडणूक लढवण्यासाठी आम्ही चाचपणी करत आहोत. अशावेळी काँग्रेस गोवा आणि उत्तर प्रदेशात निवडणुका लढवत आहेत,” असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, ''युपीए अधिक मजबूत व्हायला पाहिजे हे सगळ्यांचं म्हणनं आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी एका चांगल्या भावनेनं सांगितलं आहे. जेव्हा आपण एखादी लढाई लढतो त्यावेळी, हा फ्रंट तो फ्रटं, गट तट असं न करता जी आघाडी आहे ती मजबूत करायला हवी,''

''राहुल गांधी यांनी पुढाकार घेतला असल्यास शरद पवार यांनी पुढाकार घेऊ नये, असं नाही. शरद पवार यांच्या ऊंचीचा नेता देशात नाही. राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली तेव्हा देखील हा विषय समोर आला होता.देशभरात कुठेही एकच आघाडी व्हायला हवी, अशी आमची भूमिका आहे. तर, शरद पवार यांची देखील भूमिका आहे,'' असं राऊत यांनी सांगितलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT