<div class="paragraphs"><p>Narendra Modi and Amit Shah</p></div>

Narendra Modi and Amit Shah

 

Sarkarnama

देश

केंद्राची मोहिम राबवायला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा नकार: काढला नवा फतवा

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शाळांमध्ये सूर्यनमस्कार घालण्याची केंद्र सरकारची (Central Government) मोहिम वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मोहिमेला राबवायला अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (All India Muslim Personal Law Board) कडाडून विरोध केला असून ती राबवायला नकार दिला आहे. हा उपक्रम भारतीय राज्यघटनेच्या विरोधात आहे व सूर्यनमस्कार ही एक पूजा पध्दती आहे. इस्लाम कोणत्याही पूजा-आर्चेस मान्यता देत नाही असेही मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे.

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे महासचिव हजरत मौलाना खालिद सैफुल्‍लाह रहमानी (Khalid Saifullah Rahmani) यांनी सूर्यनमस्कार घालण्यास विरोध करणारा फतवा जारी केला आहे. यात मुस्लिम विद्यार्थ्यांनी या सुर्यनमस्कार मोहिमेत सहभागी होऊ नये व सूर्यनमस्कार घालू नयेत असे निर्देश दिले आहेत. सूर्य हा देव व त्याच्या पूजेचा मार्ग सूर्य नमस्कार घालणे असे याचे स्वरूप आहे. मात्र इस्लाम व भारतीय मुस्लिमही सूर्याला देव मानत नाहीत व त्याची पूजाही करणे धर्मतत्वांच्या विरोधात आहे. त्यामुळे सरकारने हा आदेश मागे घेऊन देशाच्या धर्मनिरपेक्ष भावनेचा सन्मान करावा असेही लॉ बोर्डाने म्हंटले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त (75 years of India's Independence) १ ते ७ जानेवारी दरम्यान सर्व शाळांमध्ये सूर्य नमस्कार मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ३० हजार शाळांना यात सामील करून घेण्यात आले आहे. देशभरात १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक शाळेमध्ये साप्ताहिक कार्यक्रम करण्याची केंद्राची योजना आहे. मात्र सूर्य नमस्कार हे पूजापध्दतीचे रूप असून इस्लाम अशा कोणत्याही पूजेला मान्यता देत नाही, त्यामुळे मुस्लिम विद्यार्त्यांनी यात सहभागी होऊ नये असे रहेमानी यांनी आपल्या फतव्यात म्हटले आहे.

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ही भारतीय मुस्लिम समाजामधील मोठी व प्रभावशाली संस्था असल्याने या संस्थेच्या या विरोधाला महत्व आले आहे. केंद्राचा हा कार्यक्रम, भारतीय नागरिकांना धार्मिक उपासना पध्दतीच्या स्वातंत्र्यास मान्यता देण्याच्या राज्यघटनेतील तत्वाच्याही विरोधात असल्याचे रहेमानी यांनी स्पष्ट केले आहे. भारत हा एक धर्मनिरपेक्ष, बहुधार्मिक व बहु सांस्कृतिक देश आहे. याच सिद्धांतांवर आमची घटना लिहीली गेली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शालेय कामकाजाच्या आखमीतही याचे काटेकोर भान ठेवले गेले. मात्र सूर्य नमस्कार घालण्याचा केंद्र सरकारचा ताजा आदेश घटनेच्या विरोधात आहे असे रहेमानी यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT