Narendra Modi Sarkarnama
देश

PM Modi In Old Parliament: जुन्या संसदेतील शेवटचे अधिवेशन; पंतप्रधान मोदींनी सांगितल्या कडू-गोड आठवणी

Sunil Balasaheb Dhumal

Delhi Political News : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शहिदांनी संसदेत बॉम्बचा धमाका केला. स्वातंत्र्यानंतर लोकशाही टिकवण्यासाठी सदस्यांनी पोटतिडकीने आपला आवाज उठवला. संसदेत हा आवाज नादब्रह्मासारखा अजूनही घुमत आहे, असे भावुक होत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेतील आजपर्यंतच्या अनेक कडू-गोड आठवणींना उजाळा दिला. या वेळी त्यांनी शहिदांसह, काँग्रेस-भाजपचे बड्या नेत्यांच्या योगदानाचे कौतुक केले. तसेच काही आठवणी सांगताना विरोधकांना चिमटेही घेतले. (Latest Political News)

केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान विशेष अधिवेशन बोलावले आहे. १७ लोकसभेचे हे १३ तर राज्यसभेचे २६१ अधिवेशन आहे. पहिला दिवस जुन्या संसदेत तर दुसऱ्या दिवसापासून हे अधिवेशन नव्या संसदेत भरणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्या पहिल्या दिवसाची आठवण झाली. यानंतर त्यांनी ही संसद स्वातंत्र्यपूर्वीपासून देशाच्या लोकशाहीतील जडणघडणीची साक्षीदार असल्याचे म्हणत अनेक कडू-गोड आठवणी सांगितल्या. या संसदेत सात-साडेसात हजार सदस्यांचा आवाज कायम नादब्रह्मासारखा घुमत राहिल्याची भावना मोदींनी व्यक्त केली.

ही संसद पंडित जवाहरलाल नेहरूंच्या 'अॅट द मीडनाईट स्ट्रोक' या स्वातंत्र्याच्या रात्री केलेल्या विधानाची साक्षीदार आहे. अटल बिहारी वाजपेयींचा सरकारे येतील जातील, पक्ष बनतील-बिघडतील, मात्र देश टिकला पाहिजे, हा आवाजही संसदेत घुमत आहे. तसेच शहिदांनी याच संसदेत स्वातंत्र्यासाठी देशवासीयांचा आवाज ब्रिटिशांपर्यंत पोहाेचवण्यासाठी बॉम्बचा धमाका केला होता. या संसदेने देशाची जडणघडण पाहिली आहे, असे मोदी म्हणाले. (Maharashtra Political News)

या वेळी मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, चरणसिंग, नरसिंहराव, मनमोहनसिंग यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले. आणीबाणीच्या निर्णयावरून विरोधकांना टोकले. आर्टिकल ३७० सारखा अभिमानास्पद निर्णयावर संसदेला गर्व वाटेल, असे म्हणाले. या संसदेने कमी सदस्य असलेल्या पक्षाचा पंतप्रधान तर जास्त सदस्य असलेले विरोधात बसलेले नेते पाहिले.

एका मतानेही सरकार पडते, याची प्रचितीही ससंदेने करून देत लोकशाहीची ताकद सांगितली. संसदेतील निर्णयामुळे छत्तीसगड, झारखंड आणि उत्तरांचल या तीन राज्यांची आनंदाने निर्मिती झाली, तर तेलंगणा राज्याचा रक्तरंजित इतिहासही संसदेने पाहिला. अशा अनेक आठवणींना उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसदेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT