Nitish Kumar: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी इथं मतदान होणार आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, यंदा एनडीएकडून बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून नितीश कुमार यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल? हे ठरवंल जाईल असं नुकतंच अमित शहा यांनी म्हटलं होतं. यावरुन नितीश कुमारांच्या अत्यंत विश्वासू नेत्यानं भाजपला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणाचा संदर्भ देताना नितीश कुमार हे काही एकनाथ शिंदे नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे.
नितीश कुमार यांचे विश्वासू सहकारी आणि जेडीयूचे वरिष्ठ नेते आणि सल्लागार के. सी. त्यागी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांचं आरोग्य, विरोधकांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तेजस्वी यादव, बिहारमधील नवीन जनसुराज्य पार्टी आणि याचे प्रमुख प्रशांत किशोर यांचा उदय तसंच अमित शहांची भूमिका आणि इतर विषयांवर सविस्तर भूमिका मांडली. त्यागी म्हणाले, जर बिहारमधील विरोधीपक्ष असलेल्या महागठबंधनला महाराष्ट्रात शिवसेनेत झालेली फूट आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांच्यासारखी परिस्थिती बिहारमध्ये उद्भवू शकते असं वाटत असेल तर मी त्यांना हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की, नितीश कुमार हे एकनाथ शिंदे नाहीत. त्यांना तसं कोणी बनवूही शकत नाही. नितीश कुमार स्वतःच एक मोठे नेते आहेत. ते जवळपास २० वर्षे बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. यासाठी त्यांनी कुठल्याही आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला असला तरीही.
मला अमित शहांच्या विधानाचे देखील अनेक अर्थ काढायचे नाहीत. कारण एनडीएच्या एक डझनाहून अधिक नेत्यांनी यामध्ये काही भाजपचे नेते देखील सामिल आहेत. यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार यांच्या नावालाच मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन दिलं आहे. तुम्ही लढाईच्या मध्येच आपला कॅप्टन बदलू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी शहांच्या विधानावरुन भाजपला स्पष्ट संदेश दिला आहे.
दरम्यान, महागठबंधनचा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्या नावाच्या घोषणेवर भाष्य करताना त्यागी म्हणाले की, मी हे जबाबदारीनं बोलतोय की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देखील तेजस्वी यादव मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा नाही. या घोषणेमुळं ते खूश नाहीत. तेजस्वी यादव यांच्या खैराती राजकारण आम्हाला समजत नाहीए. कारण अडीच कोटी लोकांना त्यांनी महिन्याला ३०,००० रुपये वेतन देण्याचं जाहीरनाम्यात म्हटलं आहे. यासाठी वर्षाला ९ लाख कोटी रुपयांचा खर्च येईल. पण राज्याचं बजेटचं ३.२५ लाख कोटींहून कमी आहे.
तसंच लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार हे खरे समाजवादी नेते पुन्हा एकत्र येण्याची काही शक्यता आहे का? या प्रश्नावर त्यांनी अशी कुठलीही शक्यता नसल्याचं म्हटलं. आम्ही इंडिया ब्लॉकला एक संधी दिली होती. पण ते नितीश कुमार यांचा सन्मान राखू शकले नाहीत. काँग्रेस आपल्या अहंकारातून बाहेर येऊ शकली नाही. उलट आठवणींच्या सहाय्यानं आपलं राजकारण करत राहिली. पण आता ते हक्काच्या भावनेनं ग्रस्त झाले आहेत. उलट एनडीएचा हिस्सा असल्याचा आम्हाला आनंद असून गर्वही आहे. इथं आम्ही जास्त उदार आणि सन्मानजनक स्थितीत आहोत, असं के. सी. त्यागी यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.