Bihar Politics Sarkarnama
देश

Bihar Politics : भाजपचा ‘कर्पूरी’ इफेक्ट बिहारमध्ये सत्तांतराचे संकेत

Sachin Deshpande

Nitish Kumar : इंडिया आघाडीत काँग्रेसने पदापासून उपेक्षित ठेवलेले बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार पुन्हा भाजपाच्या गळाला लागले आहेत. काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीचे अस्तित्वच त्यामुळे धोक्यात आले आहे. नितीश कुमार यांच्या गच्छंतीमुळे आता इंडिया आघाडीत इतर घटक राज्यस्तरीय पक्षांना सांभाळण्याचे कौशल्य काँग्रेसला दाखवावे लागेल.

नितीश कुमार बाहेर पडल्यांनतर काँग्रेसला इतर सर्व पक्षांच्या मागण्यांची पूर्तता करावी लागेल. अशात ‘सिट शेअरींग’ करताना काँग्रेसला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहे. बिहारचे दोनदा मुख्यमंत्री असलेले जननायक समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी वर्षात मोदी सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान देत संयुक्त जनता दलाचे नितिश कुमार यांना योग्य तो संदेश दिला आहे.

भाजपने दिलेल्या या संदेशानुसार जनता दल आणि भाजपाचे सरकार बिहारमध्ये स्थापन होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. रविवारी हा शपथ विधी सोहळा होणार आहे. सोहळ्यात नितिश कुमार मुख्यमंत्री तर भाजपाचे सुशिलकुमार मोदी हे उपमुख्यमंत्री होतील अशी शक्यता विर्तविली जात आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांचा ‘एनडीए’मध्ये पुन्हा प्रवेश हा काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. याचा मोठा फटका इंडिया आघाडीला उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये बसणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेत गुंतले असताना भाजपाने बिहारचे जननायक कर्पूरी ठाकूर यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न जाहीर केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना ‘एनडीए’मध्ये ओढण्यात यशस्वी चाल खेळली. यात काँग्रेस गाफिल राहिली. इतकेच नाही तर काँग्रेसने काही चाली खेळण्यापूर्वी रविवारी भाजपा प्रणित नितिश सरकारचा शपथविधी घेण्याच्या हालचाली वेगाने घडत आहेत. पटना हे राजकीय भूकंपाचे केंद्र राहणार असून दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीला धक्के देणारे ठरले आहे. बिहारच्या घडामोडीनंतर आता इंडिया आघाडीत पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे त्याच बरोबर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे वजन वाढलेले असेल. हे दोन्ही नेते जे म्हणतील ती पूर्व दिशा काँग्रेसला देखील मान्य करावी लागेल.

‘आप’चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील दुखावून चालणार नाही. बिहारच्या या घडामोडींमुळे केंद्रातील ‘एनडीए’ सरकारला मोठा दिलासा मिळाला असून याचा लोकसभा निवडणूकीत भाजप सकारात्मक फायदा होईल. त्याच बरोबर जनमानसात नितिश कुमार यांच्या स्वच्छ प्रतिमेचा फायदा भाजपा करुन घेईल.

ट्विटरवरील तीन पोस्ट

‘आरजेडी’ प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी आपल्या ट्विटर (एक्स) अकाउंटवर एकापाठोपाठ तीन पोस्ट केल्या होत्या. या पोस्टमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यानंतर त्यांनी त्या डिलिट केल्या. त्यांनी पहिल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, समाजवादी असल्याचा दावा करणारे हवा बदलते तसे विचारधारा बदलतात. दुसऱ्या पोस्टमध्ये रोहिणी यांनी लिहीले होते की, जेव्हा स्वतःची वर्तुवणूक चांगली नसेल तर वाईट वाटून उपयोग नसतो. नशिबात असलेल्या गोष्टी कोणी टाळू शकत नाही. आपल्या तिसऱ्या पोस्टमध्ये रोहिणी म्हणाल्या होत्या की, बऱ्याचदा लोकांना आपले दोष दिसून येत नाहीत, मात्र दुसऱ्यांवर हे बेशरम लोक आरोप करत राहतात. रोहिणी आचार्य यांनी या पोस्टच्या माध्यमातून नाव न घेता नितीश कुमार यांच्यावर हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

संख्याबळाचे गणित

बिहार विधानसभेत 243 जागांपैकी सर्वांत मोठा राजकीय पक्ष आरजेडी आहे. आरजेडीचे 79 आमदार आहेत. त्यापाठोपाठ भाजपचे 78, संयुक्त जनता दलाचे 45, काँग्रेसचे 19 आमदार आहेत. सीपीआय एमएलचे 12, सीपीआय (एम) आणि सीपीआयचे प्रत्येकी दोन, हिंदुस्थानी अवाम मोर्चाच्या (सेक्युलर) चार जागा आणि एमआयएमचा एक तसेच एक अपक्ष आमदार असे संख्याबळ बिहारचे आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT