Army Officer, Soldier Killed In Action In Counter-Terror Operation In J&K
Army Officer, Soldier Killed In Action In Counter-Terror Operation In J&K 
देश

आधी सात नागरिकांच्या हत्या अन् आता पाच दिवसांत सात जवान धारातीर्थी

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पुंछ जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवादी व लष्करामध्ये उडालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह दोन जवान शहीद झाले. सोमवारी चकमकीत एका अधिकाऱ्यासह पाच जवान धारातीर्थी पडले होते. दहशतवाद विरोधी अभियानाअंतर्गत पुंछमधील मेंढर येथील नार खास जंगलांमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेणाऱ्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

सोमवारी दशहवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्यानंतर लष्कराने त्यांची शोधमोहिम जोरात सुरू केली होती. त्यांचा शोध सुरू असतानाच याच दहशतवादी गटाशी शुक्रवारी पुन्हा चकमक उडाली. यामध्ये एका अधिकाऱ्यासह गंभीर जखमी झाले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अजूनही ही चकमक सुरू असल्याचे समजते. मागील चार दिवसांपासून लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

उंच डोंगर आणि जंगलांमुळे त्यांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. मागील पाच दिवसांत सात जवान शहीद झाले आहेत. त्याआधीच्या दोन आठवड्यांत काही दिवसांच्या अंतराने दहशतवाद्यांनी सात नागरिकांची हत्या केली आहे. दशतवाद्यांनी मागील आठवड्यात गुरूवारी श्रीनगरमध्ये एका महिलेसह दोन शिक्षकांची हत्या केली. काश्मीरमध्ये 48 तासांच्या आत झालेली ही दुसरी घटना होती. मागील आठवड्यातच मंगळवारी एका औषध विक्रेत्यासह तीन नागरिकांची हत्या करण्यात आली आहे.

दोन शिक्षकांमध्ये एक काश्मिरी पंडित आणि एका शीख महिलेचा समावेश आहे. गुरूवारी सकाळी 11.15 च्या सुमारास श्रीनगर जिल्ह्यातील संगम ईदगाह येथील सरकारी शाळेतील दोन शिक्षकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले. महिला शिक्षिका शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. सुखविंदर कौर असं त्यांचं नाव आहे. मंगळवारी श्रीनगरमधील प्रसिध्द उद्योजक व औषध विक्रेते माखन लाल बिंद्रो यांची हत्या करण्यात आली होती. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास 70 वर्षीय बिंद्रो यांच्या दुकानातच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

बिंद्रो हेही काश्मिरी पंडित होते. 1990 च्या दशकात दहशतवादी कारवायांनी टोक गाठलेलं असतानाही बिंद्रो यांनी काश्मीर सोडले नव्हते. ते तिथेच राहून औषध दुकान चालवत होते. मंगळवारी बिंद्रो यांच्यासह आणखी दोघांची हत्या करण्यात आली होती. श्रीनगरमधील एक फळ विक्रेता व बंदीपुरातील एका नागरिकाचा त्यामध्ये समावेश आहे. ते मोहम्मद शफी असून येथील एका टॅक्सी स्टँडचे अध्यक्ष होते. तर फळ विक्रेत्याचे नाव विरेंदर पासवान असून ते बिहारचे रहिवासी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT