Defence Ministry Clarification : 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान सहा भारतीय जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ही माहिती पहिल्यांदाच समोर आल्याच्या बातम्या अनेक माध्यमांसह आणि सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्या होत्या. शिवाय काँग्रेसने देखील 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सहा जवानांच्या बलिदानाची माहिती सरकारने दडवून ठेवली आणि त्यांना योग्य सन्मान दिला नाही, असा आरोप केला होता.
या सर्व आरोपांवर आता संरक्षण मंत्रालयाने स्पष्टीकरण देत देशाने या शूर जवानांना योग्य वेळीच सन्मान दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची नोंद देश कायम आदराने ठेवेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. काँग्रेस नेते पवन खेडा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारने ऑपरेशन सिंदूरमधील सहा जवानांच्या बलिदानाची माहिती जवळपास वर्षभर जाहीर केली नाही, असा दावा केला होता.
यानंतर संरक्षण मंत्रालयाने कोणाचेही नाव न घेता काही माध्यमांमधील बातम्या आणि सामाजिक माध्यमांवरील पोस्टमधून चुकीची माहिती प्रसारित होत असल्याचे म्हटले. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ११ मे २०२५ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या जवानांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या बलिदानाचा अधिकृत उल्लेख केला होता.
त्यानंतर १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या निवेदनात त्यांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. तसेच लष्कराच्या अधिकृत सामाजिक माध्यमांवरही त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता. यावर्षी जयपूर येथे झालेल्या सेना दिनाच्या कार्यक्रमात लष्करप्रमुखांनी तीन शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सेना पदक प्रदान केले होते.
तसेच ८ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या समारंभात हवाई दलप्रमुखांनी संबंधित शहीदाच्या कुटुंबीयांना सन्मानचिन्ह बहाल केले होते. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, या सहाही शहीद जवानांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकावरील स्मृतिभिंतीवर कोरण्यात आली आहेत. यामध्ये सूबेदार मेजर पवन कुमार, रायफलमन सुनील कुमार, लान्स नायक दिनेश कुमार, अग्निवीर मूड मुरलीनाईक, हवालदार सुनील कुमार सिंह आणि हवाई दलाचे सार्जंट सुरेंद्र कुमार यांचा समावेश आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर' राबविण्यात आले होते. शहीद जवानांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर समाविष्ट करण्यासाठी ठरावीक प्रक्रिया असते आणि ती काळजीपूर्वक पूर्ण करण्यात येते, असे मंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच अशा प्रकारचे वाद आणि चुकीची माहिती शहीदांच्या कुटुंबीयांना मानसिक वेदना देणारी असल्याचेही मंत्रालयाने नमूद केले आहे.
दरम्यान, माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर चुकीचा दावा केला जात आहे की, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान देशासाठी बलिदान देणाऱ्या सहा वीर सैनिकांना नुकतीच पहिल्यांदाच अधिकृत मान्यता देण्यात आली किंवा त्यांचे बलिदान पहिल्यांदाच समोर आणले गेले. हा दावा अजिबात खरा नाही. तर या बातम्या समोर येण्याच्या खूप आधीच देशाने या शहीदांना वेळेत श्रद्धांजली वाहिली होती.
११ मे २०२५ रोजी झालेल्या एका अधिकृत पत्रकार परिषदेत तत्कालीन डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स यांनी या वीर सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, या सैनिकांनी 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान आपली ड्युटी करताना सर्वोच्च बलिदान दिले आहे, असं स्पष्टीकरण आता संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे.