mukesh Ambani
mukesh Ambani  Sarkarnama
देश

जनरेट्यापुढे सरकार नमलं! कमलापूरमधील हत्तींबाबत सरकारची मोठी घोषणा

सरकारनामा ब्युरो

नागपूर : गडचिरोलीमधील कमलापूर हत्ती कँम्पमधील (Kamlapur Elephant park) हत्ती गुजरातला पाठविण्याच्या निर्णय अखेर रद्द होण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचे नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांच्या जामनगर येथील रिलायन्सच्या खाजगी प्राणी संग्राहलयात येथील हत्ती पाठविण्यात येणार होते. यासाठी राज्याच्या वनविभागाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी मिळाली होती. मात्र राज्यभरातून या निर्णयाचा तीव्र विरोध होत असल्यामुळे अखेर या जनरेट्यापुढे सरकार नमलं आहे.

विजय वडेट्टीवर याबाबतची घोषणा करताना म्हणाले, मागच्या दोन ते तीन वर्षांपासून त्याठिकाणी तीन हत्तींचा मृत्यू झाला होता. तसेच तिथे प्रशिक्षित माहूत मिळण्यासाठीही अडचणी होत्या. त्यामुळे सगळे हत्ती नाही, मात्र काही हत्ती हे गुजरातला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हे हत्ती गुजरातला न पाठवू नये अशी मी मुख्यमंत्र्यांना (Cm Uddhav Thackeray) विनंती केली आहे. त्याचबरोबर या हत्तींच्या संगोपणासाठी संबंधित ठिकाणी एक एलिफंट पार्क विकसीत करावे, त्याला ५० कोटींचा निधी द्यावा. तिथे श्रीलंकेच्या धर्तीवर पर्यटन क्षेत्र विकसीत करावे असे पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री याबाबत अगदी सकारात्मक आहेत, त्यामुळे हत्ती गुजरातला पाठविण्याचा निर्णय रद्द होईल, असेही मंत्री वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

गुजरातमधील जामनगर भागात मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून देशातील सर्वांत मोठे प्राणी संग्रहालय उभारण्यात येत आहे. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या केंद्रीय प्राणी प्राधिकरणाकडून १२ फेब्रुवारी २०१९ रोजी या प्राणी संग्रहालयास मंजुरी देण्यात आली आहे. जवळपास २५० एकरांवर पसरलेल्या या नविन प्राणी संग्रहालयात देशभरातील विविध ठिकाणचे दुर्मिळ आणि अतिदुर्मिळ प्राणी नेण्यात येणार आहेत.

यापुर्वी २०२० मध्येच गुजरातमधील दुर्मिळ १२ चित्यांना या प्राणीसंग्रहालयात हलविण्यात आले आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील येथील एकमेव पाळीव हत्ती कँम्पमधील हत्तींना देखील तिथे पाठविण्यात येणार होते. त्याबाबतचे पत्रही गडचिरोलीचे प्रादेशिक वनसंरक्षक यांना राज्याच्या वनविभागाकडून पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार या हत्तींना २ गटात नेण्यात येणार होते. पहिला गट या महिन्यात स्थानांतरित केला जाणार होते.

मात्र या हत्तींना गुजरातमध्ये पाठविण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध होत होता. कारण मागच्या काही वर्षांपूर्वी या हत्ती कॅम्पला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात आले. पाळीव हत्ती असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव हत्ती कॅम्प आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातुन आणि शेजारील मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांमधून या हत्तींना पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ लागलेली असते. मात्र येथील हत्तींना गुजरातला हलविल्यानंतर या ठिकाणच्या पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत होते. अखेर आता या जनरेट्यापुढे सरकार नमलेले पाहायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT