PM Narendra Modi
PM Narendra Modi Sarkarnama
देश

भाजप खासदारांच्याच मागणीसाठी मोदींनी चार वर्षे पाहिली निवडणुकीची वाट!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : शिखांचे दहावे गुरू, गुरू गोविंद सिंग (Guru Govind Singh) यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ता. 26 डिसेंबर हा दिवस देशात 'वीर बाल दिन' (Veer Baal Diwas) म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली आहे. ही मागणी भाजपच्याच खासदारांनी एप्रिल 2018 मध्ये म्हणजे जवळपास चार वर्षांपूर्वी केली होती.

गुरू गोविंद सिंग यांची जयंती देशात प्रकाश पर्व म्हणून साजरी केली जाते. याचेच औचित्य साधत पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली आहे. आजच्या प्रकाश पर्वानिमित्त ही घोषणा करताना मला अभिमान वाटत आहे. 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिन म्हणून साजरा केला जाईल. गुरू गोविंद सिंग यांच्या मुलांच्या धाडसाला आणि त्यांच्या न्यायाच्या शोधाला ही समर्पक श्रद्धांजली असेल. साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना याच दिवशी भिंतीत जिवंत गाडले होते. या दोन महात्म्यांनी धर्माच्या उदात्त तत्त्वांपासून विचलित होण्याऐवजी मृत्यूला प्राधान्य दिले, असं मोदींनी म्हटलं होतं.

याबाबत भाजपचे खासदार परवेश साहिब सिंग यांच्यासह अनेक खासदारांनी एप्रिल 2018 मध्येच पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. त्यासाठी त्यांनी खासदारांची स्वाक्षरी मोहिमही राबवली होती. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन (ता. 14 नोव्हेंबर) हा देशात बाल दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस बदलून 26 डिसेंबर रोजी बाल दिन साजरा करण्याची मागणी त्यांनी केली होती.

पंतप्रधान मोदींनी 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिनची घोषणा करत खासदारांची ही मागणी मान्य केली आहे. पण आता त्याला पंजाबमधील विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election) संदर्भ जोडला जाऊ लागला आहे. सोशल मीडियात अनेक नेटकऱ्यांनी ट्विट करत मतं व्यक्त केली आहेत. 2018 नंतर चार वर्षे गेली. पण या काळात पंजाबची (Punjab) निवडणूक नसल्याने ही घोषणा करण्यात आली नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर ही घोषणा केली, असं काहींनी म्हटलं आहे.

पंजाबची निवडणूक 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी केवळ एक महिन्याचा कालावधी बाकी आहे. त्याआधीच पंतप्रधानांनी ही घोषणा केली आहे. पंजाबमधील अनेक नेत्यांनी या घोषणेचे स्वागत केलं आहे. ता. 5 डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील भाजपनं त्रुटीवरून काँग्रेस सरकारला घेरलं आहे. तर सभेला गर्दी नसल्याने पंतप्रधान परत गेल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. त्यातच मोदींनी केलेल्या या घोषणेचा भाजपला पंजाबमध्ये किती फायदा होणार, हे येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT