Modi 3.0 Cabinet
Modi 3.0 Cabinet Sarkarnama
देश

Modi 3.0 Cabinet: मोदींचा राजीनामा नाही; केजरीवालाचं भाकीत खोटं ठरणार?

Uttam Kute

भाजपमध्ये 75 वर्ष वय झालेल्या व्यक्ती या राजकारणात सक्रिय नसाव्यात, असा अलिखित नियम आहे. पण काल केंद्रातील एनडीए तथा मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा (Modi 3.0 Cabinet) शपथविधी काल झाला. ७२ जणांनी शपथ घेतली.

वयाच्या पंच्याहत्तरीत निवृत्त करणाऱ्या भाजपच्या अलिखीत नियमाची या मंत्रिमंडळात मोडतोड झाल्याचे दिसले. कारण ७९ वर्षाचे जितनराम मांझी (Jitanram Manjhi) यांचा त्यात समावेश आहे. ७९ वर्षीय मांझी यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याने मोदीही 75 वर्षांनंतरही सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरवाल यांनी मोदींच्या निवृत्तीवर काही दिवसापूर्वी भाष्य केले होते. नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2025मध्ये 75 वर्षाचे होत आहेत.पंतप्रधान जरी झाले तरी ते राजीनामा देतील, अमित शाह हे पंतप्रधान होतील, असे भाकीत केजरीवाल यांनी केले होते. पण आता केजरीवालांचे ते भाकीत खोटं ठरणार असल्याचे चित्र आहे.

भाजपच्या निवृत्तीच्या निर्णयाचं पालन मोदी करतील, अशी आशा केजरीवाल यांना होती. तरुणाईवर भर देणाऱ्या भाजपचे केंद्रीय मंत्रीमंडळ हे ज्येष्ठत्वाकडे झुकलेले असून त्याचे सरासरी वय ५८आहे. कॅबिनेट मंत्र्यांच्या सरासरी आयुर्मानाने,तर ज्येष्ठत्व ओलांडले असून ते ६१ आहे.

राज्यमंत्र्यांचे सरासरी वय ५६ आहे. कॅबिनेटमध्ये सर्वात ज्येष्ठ मंत्री जितनराम मांझी (वय ७९)आहेत. ते बिहारमधील हिंदूस्थान अवाम मोर्चाचे एकमेव खासदार आहेत. त्यांनी ७५ या भाजपच्या राजकारणातील निवृत्तीच्या वय नियमाला हरताळ फासला आहे. त्याआधारे मोदींनी लालकृष्ण अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी यांना घरी बसवले आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री या महाराष्ट्रातील (रावेरच्या खासदार) रक्षा खडसे (वय ३७)आहेत.त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. त्यांना मंत्री करून फडणवीस यांना शह दिल्याची चर्चा आहे.

७२ पैकी तब्बल ६१ मंत्रीपदे स्वत:कडे ठेवत भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळावर आपला वरचष्मा ठेवला आहे. आता संरक्षण, वित्त,गृह यासारखी महत्वाची खाती ते स्वत:कडे ठेवण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजपसह महायुतीची कामगिरी निराशाजनक झाली असली,तरी मोदींनी सहा मंत्रीपदे राज्याला दिली आहेत, हे विशेष.

देशातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक खासदार निवडून दिलेल्या उत्तरप्रदेशला नऊ, तर त्याखालोखाल बिहारला आठ मंत्रीपदे त्यांनी बहाल केली आहेत. महाराष्ट्र तिसऱ्या नंबरवर आहे. दोन खासदार असलेल्या व त्यात एकच निवडून आलेल्या गोव्यालाही एक मंत्रीपद देण्यात आले आहे. एकही खासदार नसलेल्या आरपीआय`लाही मंत्रिपद दिले गेले आहे. त्यांचे राज्यसभा सदस्य रामदास आठवले यांना सलग तिसऱ्यांदा मंत्री करण्यात आले आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT