नीट पेपरफुटी प्रकरणातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली CJP (कॉक्रोज जनता पार्टी) ने दिल्लीतील जंतरमंतर येथे मोठे आंदोलन छेडले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित या गंभीर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि कार्यकर्ते एकत्र आल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
आंदोलनानंतर काही आंदोलकांनी संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, संसदेच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असल्याने त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले. यानंतर घोषणाबाजी सुरू राहिली आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना हटवण्याची कारवाई केली. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, संसदेपासून सुमारे 150 मीटर अंतरावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बळाचा वापर केला. या कारवाईत 40 ते 50 जण जखमी झाल्याचा तसेच अनेक विद्यार्थी आणि तरुणींना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दिल्लीतील या घटनेनंतर राजकीय वातावरणही तापले असून हजारो विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सरकारकडून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच विविध प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनांकडेही सरकार गांभीर्याने पाहत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप वाढल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणावर समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध करताना त्यांनी म्हटले, "विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे. आजचा दिवस लोकशाहीसाठी आणि आपल्या इतिहासासाठी 'काळा दिवस' म्हणून लक्षात ठेवला जाईल. काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांतही तुम्हाला ती लज्जा (शर्म) दिसली असती. तरीही, कर्तव्याच्या ओघात त्यांनी त्यांचे नाव असलेले बॅजेस काढले आणि पुढे सरसावले."
डिंपल यादव यांनी पुढे आरोप केला, "काही पोलीस अधिकारी गुंडांसारखे वागले. काही पोलीस सहकार्य करणारे होते, तर काही जण गणवेशाशिवाय आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली; इतकेच नाही तर त्यांना विजेचे धक्केही दिले.". "केवळ पायांवर बळाचा वापर करावा, या नियमाच्या अगदी उलट त्यांनी विद्यार्थ्यांच्या छातीवर प्रहार केले. आज त्यांनी थेट 'भारत माते'च्या हृदयावरच आघात केला आहे. आम्ही शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीची मागणी करतो. सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि उत्तरदायित्व सिद्ध केले पाहिजे."
महिला विद्यार्थिनींशी गैरवर्तन झाल्याचा आरोप करत त्यांनी म्हटले, "हाच का तुमचा 'नवा भारत', जिथे मुलींचे कपडे फाडले जातात? आम्ही अशा अनेक विद्यार्थ्यांना भेटलो ज्यांचे कपडे फाडले गेले होते." डिंपल यादव यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना म्हटले, "हे खरोखरच दुर्दैवी आहे. कदाचित भारताच्या इतिहासात असे सरकार कधीच आले नसेल जे इतके अहंकारी, निर्दयी आणि असंवेदनशील आहे आणि जे निशस्त्र विद्यार्थ्यांवर लाठीमार करते. ज्यांनी अशी जिद्द दाखवली आणि आपल्या समस्या मांडण्यासाठी दृढ विश्वासाने इथे आले, त्या सर्वांना मी सलाम करते."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.