देश

भाजपचं अखेर ठरलं! ६६६ मतांनी विजयी झालेला नेता बनणार मुख्यमंत्री

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यात भाजपने पुन्हा सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे. असे असले तरी मुख्यमंत्रिपदाचा तिढा पक्षासमोर निर्माण झाला होता. गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना डच्चू मिळण्याची चर्चा सुरू होती. यातच सावंत यांना काल (ता.१५) अचानक दिल्लीला पाचारण करण्यात आले. त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मुख्यमंत्रिपदाची माळ पुन्हा एकदा सावंत यांच्या गळ्यात टाकण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गोव्यात (Goa) विधानसभेच्या ४० पैकी २० जागा भाजपला (BJP) मिळाल्या आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि तीन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजपने गोव्यात बहुमताचा आकडा गाठला आहे. असे असताना मुख्यमंत्रिपदावरून गटबाजी उफाळली आहे. याला प्रमोद सावंत (Pramod Sawant) याचा निसटता विजयही कारणीभूत होता. साखळी मतदारसंघातून सावंत यांचा केवळ ६६६ मतांनी विजय झाला आहे. सावंत यांच्या खराब कामगिरीमुळे पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्यामुळे सावंतांची विकेट पडून मुख्यमंत्रिपदासाठी दुसरे नाव पुढे केले जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, पक्ष नेतृत्वाने पुन्हा एकदा सावंतांनाच संधी दिली आहे. विश्वजित राणे (Vishwajit Rane) हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. राणे हे आरोग्यमंत्री होते. ते आणि त्यांच्या पत्नी असे दोघेही विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत.

गोव्यात मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटता सुटेना अशी भाजपची स्थिती झाली होती. भाजपने केंद्रीय निरीक्षकांना राज्यात पाठवण्याचा निर्णय घेतला. गोव्यासाठी भाजप नेतृत्वाने केेंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि एल. मुरूगन यांना निरीक्षक नेमले आहेत. या निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. केंद्रीय निरीक्षक राज्यात येत असताना प्रमोद सावंत (Pramod Sawant) मात्र, दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला होता. प्रमोद सावंत हे काल दुपारी पणजीतून दिल्लीला रवाना झाले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, केंद्रीय निरीक्षक राज्यात येत आहेत. यानंतर आमदारांची बैठक घेऊन चर्चा केला जाईल. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेता निवडला जाईल. यानंतर सरकार स्थापना होईल. मी आज दिल्लीला जात आहे.

आमदारांचा शपथविधी

गोव्यात मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स कायम असताना राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्ले यांनी काल विधानसभेचे अधिवेशन बोलावले. या अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून आमदार गणेश गावकर यांची निवड केली आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली आहे. मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटत नसल्याने आधी आमदारांना शपथ देण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला आहे. पक्ष नेतृत्वाकडून मुख्यमंत्रिपदाच्या नावावर खल सुरू आहे. मात्र, अद्याप निर्णय होत नसल्याने आमदारांच्या शपथविधीचा निर्णय घेण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT