PM Narendra Modi Lok Sabha Sarkarnama
देश

PM Modi in Lok Sabha : लोकसभेत आज 21 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला; मनमोहन सिंग यांच्यानंतर मोदींवर आली ‘नकोशी’ वेळ…

President Address debate : लोकसभेत राहुल गांधी यांना बोलू दिले जात नसल्याचा मुद्दा आज राज्यसभेतही गाजला. सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी त्यावर आक्षेप घेतला.

Rajanand More

PM Modi speech : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरूवारी सलग तिसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तसेच काँग्रेसचे आठ खासदार निलंबित करण्यात आल्याने विरोधाची धार आणखी वाढली आहे. विरोधकांच्या या पवित्र्यापुढे सरकार हतबल झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आज लोकसभेत २१ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषण होते आणि त्यानंतर हा प्रस्ताव पारित केला जातो. मात्र, यावेळी विरोधकांमुळे सरकार बँकफूटवर गेल्याचे दिसून आले. प्रस्तावावर पंतप्रधान बुधवारी सायंकाळी पाच वाजता बोलणार होते. पण काँग्रेससह इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार गोंधळ घातल्याने आज सकाळी ११ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करावे लागले होते. काल खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह इतर खासदारांनी हातात फलक घेत थेट मोदींच्या आसनाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता.

परिणामी, पंतप्रधान आज लोकसभेत भाषण करतील, असे अपेक्षित होते. पण आजही विरोधकांच्या आक्रमकतेपुढे सरकारला कामकाज पुढे रेटता आले नाही. सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. त्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आभार प्रस्ताव पारित करण्यासाठी मतदानाला आणला. आवाजी मतदानाने हा प्रस्ताव पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय पारित करण्यात आला. पंतप्रधान आज सायंकाळी राज्यसभेत प्रस्तावार उत्तर देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, लोकसभेत राहुल गांधी यांना बोलू दिले जात नसल्याचा मुद्दा आज राज्यसभेतही गाजला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी लोकसभेत विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले जात नसल्याचे सांगताच त्यावर सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी आक्षेप घेतला. दुसऱ्या सभागृहातील मुद्दे इथे मांडू शकत नाही, असे सांगितले. तसेच त्यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख अबोध बालक असाही केला. आपला पक्ष अबोध बालकाचा बंधक बनवू नका, असे सल्ला नड्डा यांनी खर्गेंना दिला.

नड्डा यांच्या या विधानावर काँग्रेसचे सदस्य अधिक आक्रमक झाले. त्यावरून नड्डा आणि खर्गे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. राज्यसभेचे सभापती राधाकृष्णन यांनीही खर्गे यांना त्यावर बोलण्यास मनाई केली. त्यामुळे आज लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही हंगामा पाहायला मिळाला. आता राज्यसभेत तरी पंतप्रधान मोदींना आभार प्रस्तावाला उत्तर देता येणार का, याबाबत आता काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.   

काय घडलं २१ वर्षांपूर्वी?

मनमोहन सिंग पंतप्रधान असताना २००४ मध्येही त्यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करता आले नव्हते. त्यावेळी विरोधकांच्या प्रचंड गदारोळामुळे त्यांच्या भाषणाशिवाय आभार प्रस्ताव पारित करावा लागला होता. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी १० मार्च २००५ रोजीचा लोकसभेतील मनमोहन सिंग यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये विरोधकांमुळे आपल्याला १० जून २००४ रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलता आले नव्हते, असे सांगत असल्याचे मनमोहन सिंग सांगत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT