MOTN Survey : लोकसभा निवडणुकीसाठी अजुनही दोन वर्षांचा काळ बाकी आहे. मात्र, आत्ता निवडणूक झाली तर पंतप्रधान म्हणून कोणाल पसंती असेल? याबाबत इंडिया टुडे ग्रुप आणि सी वोटरने केलेल्या सर्व्हेमधील आकडेवारी समोर आली आहे.
पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये मुख्य लढत असल्याचे चित्र आहे. मात्र, तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांची या लढतीमध्ये एन्ट्री झाली आहे.
सर्व्हेनुसार पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक पसंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. त्यांना तब्बल 49 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर राहुल गांधी आहे. त्यांना 27 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
आश्चर्यकारक म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजय मिळवत पहिल्यांदाच तामिळनाडूमध्ये सत्ता मिळवणाऱ्या विजय यांना पसंती मिळाली आहे. 9 टक्के लोकांनी त्यांनी पसंती दिली आहे.
या सर्व्हेनुसार भाजपप्रणित एनडीए आघाडी पुन्हा सत्तेत येत आहे. तर, काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला विरोधामध्येच बसावे लागेल. मात्र, काँग्रेसच्या 26 जागांमध्ये वाढ होताना दिसत असून भाजपच्या मात्र 26 जागा घटत आहेत.
तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. आमदार, खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला आहे. मात्र, तरी देखील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर लोकांच्या विश्वास कायम असल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधानपदाच्या पसंतीमध्ये त्या चौथ्या क्रमांकावर आहेत. तर, अखिलेश यादव हे पाचव्या क्रमांकावर आहेत.
या सर्व्हेतील आकडे शेअर करत भाजप नेत्यांकडून काँग्रेसला टार्गेट केले जात आहे. इतके प्रयत्न करूनही काँग्रेस सत्तेत येत नसल्याचे भाजप नेते म्हणत आहेत. तर, येवढाच विश्वास असेल तर निवडणूका आत्ताच घेऊन दाखवा, असे म्हणत काँग्रेस नेते त्यांना प्रतिआव्हान देत आहेत.