Priyanka Gandhi
Priyanka Gandhi Sarkarnama
देश

अरुण कुमारच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा प्रियंका गांधी विरुद्ध योगी सरकार !

ऋषीकेश नळगुणे

आग्रा : उत्तर प्रदेशच्या आग्रामधील जगदीशपुरा भागात सफाई कर्मचारी अरुण कुमारचा (Arun kumar death) कथितपणे पोलीस कोठडीत मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. या घटनेनंतर वाल्मिकी समाजाचे लोक आक्रमक झाल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. मात्र याच मृत्युनंतर देशात पुन्हा एकदा प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) विरुद्ध योगी सरकार (Yogi Government) असा देखील संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. या व्यक्तीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आग्राकडे निघालेल्या प्रियंका यांना सध्या पोलीसांनी यमुना एक्स्प्रेस वे वरच रोखून ताब्यात घेतले होते. त्यामुळे एक्स्प्रेस वे च्या एंट्री पॉईंटवरच पोलीस व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती. सध्या त्यांना कुटुंबीयांना भेटण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

१७ ऑक्टोबर रोजी आग्राच्या जगदीशपुरा पोलीस स्थानकातुन २५ लाख रुपये गायब झाले होते. यानंतर तपासाचा भाग म्हणून पोलीस स्थानकात सफाई कामगार असलेल्या अरुणला पोलीसांनी ताब्यात घेतले होते. या दरम्यान मंगळवारी त्याची प्रकृती अचानक खालावली आणि रात्री उशिरा त्याचे निधन झाले.

प्रियंका गांधी यांनी या घटनेच्या निषेधार्थ एक ट्विट देखील केले आहे. त्या म्हणतात, एखाद्याला पोलीस कोठडीत मारहाण करून ठार करणे हा कोणता न्याय आहे? आग्रा पोलीस कोठडीत अरूण वाल्मिकीच्या मृत्यूची घटना निंदनीय आहे. भगवान वाल्मिकी यांच्या जयंतीच्या दिवशी सरकारने त्यांच्या संदेशाविरोधात काम केले आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे आणि पीडित कुटुंबास भरपाई दिली जावी, असे प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

तर माध्यमांशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, ते म्हणातात मी आग्रा येथे जाऊ शकत नाही. मी जिथे जाते मी तिथे ते मला रोखत आहेत. अशावेळी मी एका रेस्टॉरंटमध्ये बसून रहावं का? का तर केवळ ते त्यांच्या राजकारणासाठी सोयीचं ठरेल म्हणून? मला त्यांची भेट घ्यायची आहे, यामध्ये एवढी काय मोठी गोष्ट आहे?

मात्र प्रियांका गांधी यांची अशा पद्धतीने आक्रमक होण्याची हि काही पहिलीच वेळ नाही. त्यातही योगी सरकारच्या विरोधात. या अगोदर प्रियंका गांधी लखीपूर खेरीमधील (Lakhimpur Kheri) हिंसाचारात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना भेटीसाठी जात होत्या, तेव्हा देखील त्यांना पोलिसांनी रोखल होत व नंतर ताब्यात देखील घेतले होते. त्याआधी हाथरस (Hathras rape) सामूहिक बलात्कार घटनेतील पीडित कुटुंबाच्या भेटीवेळी प्रियंका गांधी-राहुल गांधी आणि उत्तरप्रदेश पोलीस एकमेकांसमोर उभे ठाकले होते. सोनभद्र प्रकरणात देखील पीडितांना भेटण्यासाठी प्रियांका गांधी २६ तास हटून बसल्या होत्या. तर गतवर्षी माजी पोलीस अधिकारी एसआर दारापुरी यांना भेटायला गेले असताना देखील प्रियंका गांधी आणि उत्तर प्रदेश पोलिस आमने-सामने आले होते. दारापुरी यांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ निदर्शन करताना पोलिसांनी अटक केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT