Bihar Violence Latest Marathi News
Bihar Violence Latest Marathi News Sarkarnama
देश

तरूणांनी इंटरसिटी एक्सप्रेस पेटवली! मोदी सरकारच्या 'अग्निपथ'ला हिंसेनं सलामी

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलांतील नवीन प्रकारच्या सैन्य भरतीच्या ‘मिशन अग्निपथ’ योजनेची घोषणा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath singh) यांनी नुकतीच केली. पण त्यानंतर आता ही योजना वादात सापडली आहे. याविरोधात बिहार पेटलं असून तरूणांनी इंटरसिटी एक्सप्रेस पेटवून दिली आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ व तोडफोडही करण्यात आली आहे. तसेच राजस्थानसह हरयाणा आदी राज्यांमध्ये तरूण रस्त्यावर उतरले आहेत. (Agneepath Recruitment Scheme)

राजनाथ सिंह यांनी नुकतीच नवी दिल्लीत या योजनेची माहिती दिली. ‘अग्निपथ’ योजनेत दर वर्षी साधारणतः ५० हजार याप्रमाणे प्रत्येकी ४ वर्षांसाठी तरुणांची सैन्यभरती करण्यात येणार आहे. ४ वर्षांनी त्यातील २५ टक्के तरुणांना नियमित लष्करी सेवेत सामावून घेतले जाणार आहे, तर उर्वरित अग्निवीरांना निवृत्तिवेतन मिळणार आहे. त्यावरूनच तरुणांमध्ये संताप निर्माण झाला आहे. ही योजना रद्द करण्याची मागणी तरूणांकडून केली जात आहे.

योजनेअंतर्गत सैन्यात भरती झाल्यानंतर केवळ चार वर्षच सेवा करता येणार आहे. त्यामुळे तरूणांमध्ये रोष वाढला आहे. बिहारमधून सैन्यात जाण्याचे प्रमाण अधिक असल्याने पहिला आगडोंब याच राज्यात उसळला आहे. बुधवारपासूनच आंदोलन सुरू असून सलग दुसऱ्यादिवशी आंदोलनाची तीव्रता वाढली आहे.

राज्यातील जहानाबाद, बक्सर, आरा, नावादा, सिवान, छपरासह अनेक भागांत तरूणांनी राष्ट्रीय महामार्ग तसेच रेल्वेमार्गांवर आंदोलन सुरू केले आहे. भभुआ रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या इंटरसिटी एक्सप्रेसला आग लावण्यात आली. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.

अग्निपथ योजनेची वैशिष्टये -

  • प्रत्येकी ४ वर्षांसाठी युवकांची लष्करासह तिन्ही सैन्यदलांत भरती केली जाईल.

  • दर वर्षी किमान ४६ हजार तरुणांची लष्कर भरती होईल.

  • चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर योजनेतील ७५ टक्के सैनिकांना सेवामुक्त केले जाईल. मात्र पुढील काळात सशस्त्र दलांतील विविध भरतीसाठी त्यांना प्राधान्य दिले जाईल.

  • २५ टक्के तरुणांना सैन्यदलांत पुढे सेवेची संधी मिळेल. मात्र जेव्हा सैन्यभरती होईल तेव्हाच या २५ टक्के युवकांना पात्रता निकष पूर्ण केल्यावर सेनेत सामावून घेतले जाईल.

या सैनिकांना वेतन पुढीलप्रमाणे मिळेल -

  • पहिले वर्ष - ३ लाख ६० हजार रुपये वार्षिक (हाती येतील - २ लाख ५२ हजार) / प्रतिमहिना - ३० हजार रुपये (हाती येतील - २१ हजार रुपये)

  • दुसरे वर्ष - ३ लाख ९६ हजार रुपये वार्षिक (हाती येतील - २ लाख ७७ हजार २००) / प्रतिमहिना - ३३ हजार रुपये (हाती येतील - २३ हजार १०० रुपये)

  • तिसरे वर्ष - ४ लाख ३२ हजार रुपये वार्षिक (हाती येतील - ३ लाख ६ हजार ९६०) / प्रतिमहिना - ३६ हजार रुपये (हाती येतील - २५ हजार ५८० रुपये)

  • चौथे वर्ष - ४ लाख ८० हजार रुपये वार्षिक (हाती येतील - ३ लाख ३६ हजार ) / प्रतिमहिना - ४० हजार रुपये (हाती येतील - २८ हजार रुपये)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT