Punjab Cabinet Sarkarnama
देश

Punjab Government : पंजाबमध्ये चार मंत्र्यांचे राजीनामे, पाच जणांचा शपथविधी; मान सरकारला कसली भीती?

Rajanand More

Chandigarh : दिल्लीमध्ये मुख्यमंत्रिपदी आतिशी यांच्यासह काही मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आम आदमी पक्षाची सत्ता असलेल्या पंजाबमध्येही राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांनी रविवारी तडकाफडकी राजीनामे दिले होते. त्यानंतर सोमवारी पाच नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

पंजाबमध्ये तीन वर्षांपूर्वी आपची सत्ता आली आहे. त्यानंतर आजपर्यंत चौथ्यांदाचा मंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. तसेच नाराज आमदारांना संधी देण्यासाठी मंत्रिमंडळात फेरबदल झाल्याचे बोलले जात आहे.

सोमवारी तरुणप्रित सिंह, बरिंदर गोयल, हरदीप मुंडिया, रवज्योत सिंह आणि मोहिंदर भगत यांचा शपथविधी झाला. राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी शपथ दिली. तर रविवारी चेतन सिंह जौरामाजरा, अनमोल गगन मान, बलकार सिंह आणि ब्रम शंकर जिम्पा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

पाच मंत्र्यांच्या शपथविधीमुळे आता भगवंत मान यांच्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 16 मंत्री असतील. पंजाब विधानसभेतील सदस्यांच्या संख्येच्या आधारे मंत्रिमंडळात केवळ 18 मंत्री असू शकतात. त्यामुळे आणखी दोन नेत्यांची मंत्रिपदावर वर्णी लागू शकते.

दरम्यान, पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आपने एकहाती सत्ता काबीज केली होती. पण त्यानंतर तीन वर्षात झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला कामगिरी खराब राहिली. लोकसभा निवडणुकीनंतर हे फेरबदल झाल्याने राजीनामा दिलेल्या चार मंत्र्यांबाबत पक्षात नाराजी होती का, अशीही चर्चा रंगू लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT