Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi news : बंडखोर उमेदवारामुळे अख्खं पॅनेल पडलं, राहुल गांधींचा थेट फोन; काँग्रेसमधील युवा नेता निशाण्यावर

Congress DUSU setback, Kanhaiya Kumar NSUI : दिल्ली विद्यापीठात एनएसयूआयचा दारूण पराभव, बंडखोर दीपांशू शौकीनच्या ऐतिहासिक विजयानंतर तिकीट वाटप, गटबाजी आणि कन्हैया कुमार यांच्या रणनीतीवर काँग्रेसमध्ये प्रश्नचिन्ह.

Rajanand More

Congress political news : दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित NSUI या विद्यार्थी संघटनेचा दारूण पराभव झाला आहे. हा पराभव काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गंभीरपणे घेतल्याचे समोर आले आहे. या पराभवाने NSUI च्या निवडणुकीच्या रणनीतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामागे दीपांशू शौकीन या बंडखोर अपक्ष उमेदवाराच्या ऐतिहासिक विजयाची किनार आहे.

दीपांशू शौकीन हे उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहे. त्यांनी तब्बल ३० हजारांहून अधिक मते घेत ऐतिहासिक विजय मिळविला आहे. विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत आतापर्यंतच्या इतिहासात एकाही उमेदवाराला एवढी मते मिळाली नव्हती, असा दावा केला जात आहे. त्याचप्रमाणे तब्बल १७ वर्षांनंतर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. उपाध्यक्षपदी अपक्ष निवडून येणारे ते पहिलेच उमेदवार असल्याचाही दावा केला जात आहे.

दीपांशू यांच्या या ऐतिहासिक विजयानंतर आणि एनएसयूआयच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी थेट काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना फोन केल्याचे वृत्त 'न्यूज १८ने दिले आहे. या वृत्तानुसार, राहुल गांधी यांनी वेणुगोपाल यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर तातडीने बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत एनएसयूआयचे प्रभारी कन्हैया कुमारही उपस्थित होते. वेणुगोपाल यांनी त्यांची कानउघाडणी केल्याचे वृत्त आहे.

विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव या चार महत्वाच्या पदांपैकी एकही पद एनएसयूआयला मिळाले नाही. उपाध्यक्षपद वगळता अन्य तीनही पदांवर भाजपची विद्यार्थी संघटना असलेल्या एबीव्हीपीचा विजय झाला आहे. उपाध्यक्षपदी दीपांशू विजयी झाले आहेत. ते एनएसयूआयचे कार्यकर्ते असून तिकीट नाकारल्याने बंडखोरी करत त्यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढविली आहे.

अपक्ष असून ३० हजारांहून अधिक मतदान मिळवत दीपांशू यांनी सर्वांनाच धक्का दिला. दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला त्यांच्यापेक्षा निम्म्याने कमी मते आहेत. यावरून त्यांची विद्यार्थ्यांमधील लोकप्रियता स्पष्ट होते. मात्र, आता एनएसयूआयमध्ये तिकीट वाटपात गटबाजी झाल्याचा आरोप होऊ लागला आहे. दीपांशू यांनीही याबाबत भाष्य केले आहे. कन्हैया कुमार यांनी अनुभवी आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय विद्यार्थी नेत्यांना डावलल्याची चर्चा सुरू झाली आहे.

उपाध्यक्षपदाप्रमाणेच सहसचिव पदासाठी विशेष यादव हे इच्छूक होते. त्यांना डावलल्याने त्यांनी समाजवादी छात्रसभेकडून निवडणूक लढविली. या लढतीत यादव यांनी तब्बल १५ हजार ७७८ मते खेचून आणली. तर एनएसयूआयचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. प्रभारी म्हणून कन्हैया कुमार यांची रणनीती या निवडणुकीत फेल ठरल्याची चर्चा आहे. राहुल गांधी यांनी त्याची गंभीरपणे दखल घेतल्याची चर्चा आहे. त्यांच्या फोननंतर वेणुगोपाल यांनी काही नेत्यांच्या उपस्थितीत कन्हैया कुमार यांच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केल्याचे न्यूज १८ने म्हटले आहे.

दीपांशू यांना एनएसयूआयकडून उमेदवारी मिळाली असती तर त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा अन्य उमेदवारांनाही झाला असता, अशीही चर्चा आता रंगली आहे. मात्र, एक तिकीट नाकारल्याने संपूर्ण पॅनेलवरच त्याचा परिणाम झाल्याचे दिसते. विशेष यादव यांच्याबाबतही हेच घडले. बंडखोरीमुळे झालेल्या मतविभागणीचा मोठा फटका काँग्रेसला बसला. एकीकडे राहुल गांधी यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी देशभरात छात्रों की गुंज ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे दिल्ली विद्यापीठासारख्या महत्वाच्या विद्यार्थी संघात पक्षाचा दारूण पराभव होणे, त्यांच्या मोहिमेला एकप्रकारे धक्का बसण्यासारखा निकाल मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT