Congress vs BJP political controversy : कॉक्रोच जनता पार्टीने सोशल मीडियात धुमाकूळ घातल्यानंतर केंद्र सरकारविरोधातही आवाज उठविण्यास सुरूवात केली आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पार्टीने मोहीम हाती घेतली आहे. सरकारसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे विरोधी पक्षासह विविध संघटनांनी म्हटले आहे. त्यातच आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारबाबत धक्कायदक विधान केले आहे.
काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत राहुल यांनी सरकार वर्षभरात कोसळेल, अशी भविष्यवाणी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक स्थिती आणि देशात वाढणारा आर्थिक असंतोष हे त्यासाठी कारणीभूत ठरतील. सध्या लोकांची नाराजी वाढत चालली असून त्याचा परिणाम भारताच्या राजकारणावरही दिसून येईल, असे राहुल यांनी बैठकीत म्हटल्याची माहिती काँग्रेसमधील सुत्रांनी दिली.
राहुल गांधी यांच्या हे विधान समोर आल्यानंतर भाजप नेते त्यांच्यावर तुटून पडले आहेत. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी देशात अराजकता निर्माण करण्याचे हे गंभीर षडयंत्र असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, राहुल गांधी यांचे विधान म्हणजे देशाविरोधात काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष आणि भारताला अस्थिर करण्याची स्वप्न पाहणाऱ्या टूलकिट गँगच्या मोठा षडयंत्राकडे इशारा करत आहे.
राहुल यांचे विधान सहज घेण्यासारखे नाही, देशात अराजकता पसरविण्याचे गंभीर षडयंत्र असल्याचा आरोपही पीयूष गोयल यांनी केला. राहुल गांधी आणि कंपनीने देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेच्या हृदयातून हटवू शकत नाही, असे पाहिल्यानंतर ते देशात हिंसा पसरवू इच्छितात. देशाचे भले ते पाहू शकत नाहीत. देशात बदनाम करणे, संविधानिक संस्थाचा अपमान करणे, परदेशात जाऊन भारतातील अंतर्गत मुद्दयांवर हस्तक्षेप करण्याचे आवाहन करणे, हे काँग्रेसचा खरा चेहरा दाखवत असल्याची टीका गोयल यांनी केली आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संबीत पात्रा म्हणाले, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी पहिल्यांदाच असा दावा केलेला नाही. २०१९ मध्येही त्यांनी पंतफ्रधान मोदींविरोधात लोक रस्त्यावर उतरतील, असे म्हटले होते. आज संपूर्ण जग युध्दामुळे संकटात आहे. तरीही भारत खंबीरपणे उभा आहे. राहुल गांधी हे देशात अशांतता पसरविणे आणि दंगली भडविण्याचे षडयंत्र रचत असल्याचे त्यांच्या विधानावरून दिसते, असे आरोप पात्रा यांनी केला आहे.