Rahul Gandhi shared the memory of Indira Gandhi

 
देश

'तो दिवस मी आजही विसरु शकत नाही, इंदिरा गांधींना...'

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : ''आज दिल्लीमध्ये विजय दिवस १९७१ (Vijay Divas 1971) च्या निमित्त एक कार्यक्रम झाला. पण या कार्यक्रमात दिवंगत इंदिरा गांधींचे (Indira Gandhi) नाव कुठेही नव्हते. ज्या महिलेनं देशासाठी ३२ गोळ्या झेलल्या, त्या महिलेचे नाव ना कार्यक्रम पत्रिकेवर होते, ना आमंत्रण पत्रिकेवर. याच कारण म्हणजे या सरकारला सत्याची भिती वाटते”, असे म्हणत कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे.

१९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव करून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं. यानिमित्त नवी दिल्लीत १९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयानिमित्त मोठा उत्सव साजरा करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेत दिवंगत इंदिरा गांधीच्या नावाचा उल्लेखही नसल्याने राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. डेहराडूनमध्ये (Dehradun) काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विजय सन्मान सभेमध्ये ते बोलताना इंदिरा गांधी यांच्या निधनाच्या दिवशी घडलेला प्रसंग सांगताना राहुल गांधी काही क्षण भावुक झाल्याचं दिसून आलं.

“मी तुमचा त्याग समजू शकतो. जे तुम्ही सहन केलंय ते आम्हीही सहन केलंय. मी तो दिवस कधीही विसरू शकत नाही, जेव्हा मला शाळेत सांगण्यात आलं की इंदिरा गांधींना ३२ गोळ्या लागल्या आहेत. तो दिवस मी आजही विसरु शकत नाही. उत्तराखंडमध्ये हजारो कुटुंब आहेत, ज्यांच्या घरी फोन आला की बाबा शहीद झाले, काका शहीद झाले. तुमच्या-माझ्यात एक नातं आहे. म्हणून मी खुलेपणानं तुमच्याशी बोलू शकतो”, अशा शब्दांत राहूल गांधीनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

'उत्तराखंडने भारताला सर्वाधिक रक्त दिले आहे आणि ते नेहमीच देत राहील. 1971 मध्ये बांगलादेशची लढाई, पाकिस्तानने अवघ्या 13 दिवसांत शरणागती पत्करली. सहसा युद्ध ६ महिने किंवा वर्षभर लढले जाते. अफगाणिस्तानला हरवायला अमेरिकेला 20 वर्षे लागली, पण भारताने अवघ्या 13 दिवसांत पाकिस्तानचा पराभव केला. हे घडले कारण भारत एकसंध होता. उत्तराखंडमधील कुटुंबांप्रमाणे माझ्या कुटुंबानेही देशासाठी बलिदान दिले. माझे उत्तराखंडशी असेच नाते आहे. ज्याप्रमाणे उत्तराखंडमधील हजारो कुटुंबांनी देशाच्या सन्मानासाठी आपले कुटुंब गमावले, त्याचप्रमाणे माझ्या कुटुंबानेही बलिदान दिले आहे,' अशा भावनाही राहुल गांधींनी व्यक्त केल्या.

तर, मोदी सरकारवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, आज लोकांना कमकुवत केले जात आहे, त्यांना आपापसात लढवले जात आहे. कमजोर लोक मारले जात आहेत. संपूर्ण सरकार दोन-तीन भांडवलदारांसाठी चालवले जात आहे. काळे कायदे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नव्हे तर ते संपवण्यासाठी करण्यात आले होते, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT