Rahul Gandhi 
देश

Rahul Gandhi: राहुल गांधींनी लोकसभेत उपस्थित केला 'त्या' ब्राझिलियन मॉडेलचा मुद्दा; म्हणाले, ही आपली लोकशाही...

Rahul Gandhi: मतचोरीच्या मुद्दावरुन राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी देशभरात रान उठवलं होतं. हरयाणातील विधानसभा निवडणूक भाजपनं चोरली असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

Amit Ujagare

Rahul Gandhi Speech at Parliament : संसदेच्या सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात निवडणूक सुधारणा या विषयावर दिवसभर चर्चा सुरु आहे. यानिमित्त लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांचं आज सभागृहात भाषण झालं. त्यांची आजची लोकसभेतील उपस्थिती लक्षवेधी होती, कारण त्यांनी खादीचा कुर्ता-पायजमा परिधान केला होता. तसंच खादी ही देशाची ओळख असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. निवडणूक सुधारणांवर बोलताना त्यांनी काही दिवसांपूर्वी मतचोरीच्या मुद्द्यावरुन रान पेटवलं होतं, तोच मुद्दा त्यांनी एकदा सभागृहात मांडला. यामध्ये त्या ब्राझिलियन मॉडेलचाही त्यांनी उल्लेख केला आणि भारताच्या लोकशाहीचे तसंच निवडणूक आयोगाचे अक्षरशः वाभाडे काढले.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

सभागृहात बोलताना राहुल गांधी म्हणाले, "मला त्या ब्राझिलियन मॉडेलचा फोटो इथं दाखवायचा होता कारण हे आपल्या लोकशाही रचनेचं ते प्रतिबिंब आहे. आपल्या लोकशाहीत हे काय सुरु आहे, जिथं आम्हाला मतदार यादीत नाव असलेल्या 'त्या' ब्राझिलियन मॉडेलचा फोटो दाखवण्याची परवानगी दिली जात नाही. जी महिला हरयाणाच्या मतदार यादीत २२ वेळा दिसली आहे. फक्त इतकचं नव्हे तर दुसरी एक महिला आहे जिचं नाव २०० पेक्षा अधिक वेळा एकाच मतदान केंद्रातील मतदार यादीत आलं आहे. यावरुन हरयाणाची निवडणूक चोरली गेली आहे, हे इतकं स्पष्ट आहे आणि मी ते सिद्ध करुन दाखवलं आहे, यामध्ये कुठलीही शंका नाही. ही चोरी निवडणूक आयोगालाही माहिती आहे हे मी अनेकदा सांगितलं आहे. पण यासंदर्भात मी जे प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले आहेत त्याची उत्तर मला अद्याप आयोगानं दिलेली नाहीत. या ब्राझिलियन महिलेचा फोटो मतदार यादीत कसा आला? याचं उत्तर मला अद्याप निवडणूक आयोगानं दिलेलं नाही"

दरम्यान, खादीच्या मुद्दयावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, खादी ही भारतीयांची अभिव्यक्ती आहे. तुम्ही कोणत्याही राज्यात जा तिथं तुम्हाला वेगवेगळं कापड पाहायला मिळेल. यामध्ये हिमाचलची टोपी, असामचा गमछा, बनारसी साडी, कांचीपुरम साडी, नागा जॅकेट आहेत. हे सर्व विविध प्रकारचे कापड हे आपल्या देशातील लोकांचं प्रतिनिधीत्व करतात. आसामी लोक आपल्याला गमछा देतात तो केवळ कपड्याचा तुकडा नसतो तर त्यामध्ये त्यांची अभिव्यक्ती असते, त्या तुकड्यातून त्यांचा इतिहास आणि संस्कृती झळकते. तसंच त्यांची भविष्यातील कल्पनाशक्ती दिसून येते. आपल्याला हे कापड वेगवेगळं दिसत असलं तरी तुम्ही जर त्याच्या खोलात गेलात तर तुम्हाला दिसेल की, त्यात हजारो लाखो धागे आहेत. यातील एक धागा तुमचं संरक्षण करु शकत नाही, एकच धागा तुम्हाला थंडीत गरम ठेवू शकत नाही, पण जेव्हा हे धागे एकत्र येतात तेव्हा ते तुमचं थंडी-वाऱ्यापासून संरक्षण करु शकतात.

याच प्रकारे आपला देश हा देखील एक कापडासारखं आहे, जे १५० कोटी धाग्यांपासून (लोकांपासून) बनलेलं आहे. तसंच हे मतदानाच्या अधिकारामुळं विणलं गेलेलं कापड आहे. जर जनतेला मताचा अधिकार नसता तर आज लोकसभा, राज्यसभा, पंचायती हे काहीही अस्तित्वात नसतं. हीच कापडाची कल्पना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दिसत नाही. त्यांना हे कापड तयार झालंय याचा आनंद आहे पण ते याची कल्पना त्यांच्यामध्ये तयार होऊ शकत नाही. संघाचा एकतेमध्ये विश्वास नाही तर जातींच्या स्तरीकरणावर विश्वास आहे आणि त्यांना यामध्ये आपणचं सर्वोच असावं असं वाटतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT