Rajasthan New Chief Minister Bhajanlal Sharma Sarkarnama
देश

Bhajanlal Sharma : राजस्थानचे मुख्यमंत्री होण्याअगोदर भजनलाल शर्मांनी भाजप विरुद्ध लढवली आहे निवडणूक!

Mayur Ratnaparkhe

Rajasthan BJP News : भाजपने छत्तीसगड, मध्य प्रदेश प्रमाणेच राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करताना सर्वांना धक्का दिला. भाजपने धक्कातंत्र कायम राखत मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेतही नसलेल्या भजनलाल शर्मा(Bhajanlal Sharma) यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या, आश्चर्यही वाटलं.

यानंतर सर्वप्रथम भजनलाल शर्मा हे नेमके कोण आहेत?, त्यांची राजकीय पार्श्वभूमीवर काय?, ते कोणत्या समाजातून आले आहेत?, कोणाच्या जवळेचे म्हणून ओळखले जातात? आदी अनेक प्रश्न उद्भवले आणि त्यानुसार माहिती समोर येऊ लागली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भजनलाल शर्मा यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली होती आणि त्यांची थेट मुख्यमंत्रिपदी वर्णी लागल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खरंतर राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधरा राजेंसह(Vasundhara Raje) अनेक दिग्गजांची नावं चर्चेत आघाडीवर होती, तर भजनलाल शर्मांचं नाव मात्र कुठेही उच्चारल्या गेलं नव्हतं.

कदाचित त्यांना स्वत:लाही आपण मुख्यमंत्री होणार आहोत, याची कल्पना नसणार. कारण, विधिमंडळ सदस्यांच्या सामूहिक फोटोमध्ये ते अगदी शेवटच्या रांगेत उभा असल्याचे दिसून आले.

मात्र भाजपने सर्व चर्चांना फोल ठरवत, सर्वांचे अंदाज चुकवत आणि दिग्गजांच्या महत्त्वकांक्षांना धक्का देत भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली. भजनलाल शर्मा यांच्या रूपाने राजस्थानला तीन दशकानंतर ब्राह्मण मुख्यमंत्री लाभला आहे. जयपूरमधील सांगानेर विधानसभा मतदार संघाचे ते प्रतिनिधित्व करतात. विशेष म्हणजे त्यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपने विद्यमान आमदाराचं तिकीट कापलं होतं.

आता भाजपने या व्यक्तीसाठी एवढा सगळा खटाटोप केला जरी असला, तरी त्यांच्याबद्दलची एक महत्त्वाची आणि तितकीच सर्वांना धक्का देणारी बातमीही समोर आली आहे. भजनलाल शर्मा यांनी 2003 भाजपविरोधातच बंडखोरी केली होती. होय, हे खरं आहे. भजनलाल शर्मा यांनी भाजपविरोधात बंडखोरी करत निवडणूक लढवली होती.

भजनलाल शर्मा यांनी वयाच्या 27 व्या वर्षी पहिली निवडणूक लढवली होती. 2003 मध्ये त्यांनी भाजपविरुद्ध बंड करून राजस्थान सामाजिक न्याय मंचाच्या तिकिटावर भरतपूरमधील नदबई येथून निवडणूक लढवली. तेव्हा भजनलाल शर्मा यांची अमानत रक्कम जप्त झाली होती. त्यांनी या जागेवरून भाजपचे(BJP) जितेंद्र सिंह आणि काँग्रेसचे यशवंत सिंह यांना आव्हान दिले होते. मात्र या निवडणुकीत अपक्ष दीपा कौर यांनी बाजी मारली होती.

यानंतर भजनलाल भाजपशी जुडले आणि संघटनात्मक कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. पुढे पक्षाकडून त्यांना अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्याही देण्यात आल्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT