Saina Nehwal and Siddharth
Saina Nehwal and Siddharth  Sarkarnama
देश

सायनाच्या वडिलांनी सिद्धार्थला इशारा दिला अन् म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंजाब (Punjab) दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीवरून मोठा गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावर काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) आरोप-प्रत्यारोपांचा सामना सुरू आहे. यावरून आता बँडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) आमनेसामने आले असून, वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी सायनाच्या वडिलांनी सिद्धार्थला इशारा दिला आहे.

पंजाबमध्ये मोदींच्या जिवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप भाजपने केला होता. यावर सायना नेहवालने ट्विट करीत या वादात उडी घेतली होती. तिने म्हटले होते की, देशात पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात तडजोड होत असेल तर तो देश सुरक्षित असू शकत नाही. पंतप्रधान मोदींवर अराजकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करते. देशाचे पंतप्रधानचं सुरक्षित नसतील तर आपण देश सुरक्षित असल्याचा दावाच करु शकत नाही.

यावर अभिनेता सिद्धार्थने ट्विट करीत सायनाला लक्ष्य केले होते. या ट्विटमधील भाषा वादग्रस्त ठरली आहे. यावर सिद्धार्थने खुलासाही केला आहे. असे असले तरी या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने तातडीने पावले उचलली आहेत. आयोगाने सिद्धार्थचे हे ट्विट ब्लॉक करण्याची मागणी ट्विटरकडे केली आहे. याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. परंतु, हा सिद्धार्थ हा चेन्नईचा रहिवासी तर सायना ही हैदराबादची रहिवासी आहे. असे असतानाही आयोगाने महाराष्ट्र पोलिसांना कारवाईचे निर्देश दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यावर आता सायनाचे वडील हरवीरसिंह नेहवाल यांनी सिद्धार्थला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, चित्रपटसृष्टीतील एका व्यक्तीने सायनाबाबत ट्विटरवर चुकीची कॉमेंट केली आहे. मी याचा निषेध करतो. आता त्याने जाहीरपणे याबाबत माफी मागायला हवी. या प्रकरणामुळे आम्ही कुटुंबीय अस्वस्थ झालो आहोत. याचबरोबर सायनाही दु:खी झाली आहे.

फिरोझपूरमध्ये पंतप्रधानांकडून 5 डिसेंबरला विविध प्रकल्पांचे उदघाटन केले जाणार होते. दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम नियोजित होता. त्याआधी पंतप्रधान मोदी हुसेनवाला येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारक येथे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण पावसाळी वातावरणामुळे त्यांनी रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला. भटिंडा येथून हा मार्ग दोन तासांचा होता. हुतात्मा स्मारकापासून 30 किलोमीटर अंतरावरील एका पुलावर वाहनांचा ताफा आल्यानंतर काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे लक्षात आले. त्यामुळे पंतप्रधानांना सुमारे 20 मिनिटे तिथेच थांबावे लागेल. सुरक्षा व्यवस्थेतील या त्रुटींमुळे पंतप्रधानांनी पुन्हा भटिंडा विमानतळाकडे जाण्याचा निर्णय घेतला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT