Sanjay Raut, Devendra Fadnavis .jpg
Sanjay Raut, Devendra Fadnavis .jpg Sarkarnama
देश

राऊतांनी सांगितला फडणवीसांचा पायगुण : "ते गेले आणि पक्षच फुटला"

सरकारनामा ब्युरो

मुंबई : देशात ५ राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. या राज्यांमध्ये भाजपचेच सरकार येणार असे दावे भाजपचे नेते करत आहेत. मात्र या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाचा काहीसा भाग महाराष्ट्रात देखील पार पडत आहे. त्याचे कारण म्हणजे शेजारीच असलेल्या गोव्याच्या निवडणुका (Goa Assembly election). गोव्यात सध्या भाजपचे प्रभारी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत. तर शिवसेना देखील या गोव्याच्या राजकीय मैदानात उतरला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेने (Shivsena) आपले डिपॉझिट जप्त होऊ नये याकडे लक्ष द्यावे असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीसांच्या याच टीकेवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर देत आपला पक्ष भाजपाच्या नोटांना पुरून उरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तसेच यावेळी बोलताना संजय राऊत यांनी फडणवीसांचा पायगुणही काढलाच. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून गोव्यात गेले. पण आपण पाहिले असेल की, ते गोव्यात गेल्याबरोबर तिथे भारतीय जनता पक्षही फुटला. काल मंत्री मायकल लोबो यांनी भाजपचा त्याग केला. प्रविण झांट्ये यांनीही पक्ष सोडला. त्यामुळे त्यांनी आधी पक्षांतर्गत जे काही युद्ध सुरू आहे ते लढावे आणि नंतर गोव्यात भाजप सरकार येणार असल्याचा दावा करावा," असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

दरम्यान तुम्ही कितीही नोटा टाका, शिवसेना त्या नोटांना पुरुन उरेल असे आव्हान त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले. ते म्हणाले, शिवसेना हा सामान्यांचा, बहुजनांचा आणि हिंदुत्ववादी पक्ष आहे. शिवसेना या भाजपच्या नोटांना पुरून उरणारा पक्ष आहे. महाराष्ट्रातून नोटांच्या बॅगा कुठे किती आणि कशा जातात हा सगळा प्रकार मला माहित आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझा शब्द आहे की तुम्ही कितीही नोटा टाका, पण तुमच्या नोटांशी आम्ही लढू आणि जिंकू. आपण गोव्याच्या जनतेला या नोटांच्या दबावाखाली न येता आपला आणि गोव्याच्या विकासाचा विचार कोण करणार या सगळ्यांचा विचार करून मतदान करा हे सांगण्याचा प्रयत्न करत राहू असेही राउत म्हणाले.

गोव्याचा राजकीय प्रवास परिवर्तनाच्या दिशेने...

गोव्याचा राजकीय प्रवास हा परिवर्तनाच्या दिशेने सुरु झाला असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, जे काही सर्वेनुसार ओपिनियन पोल येत आहेत त्यानुसार, उत्तरप्रदेशात भाजप पुन्हा सत्तेत येईल असे म्हटले जात आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण एक गोष्ट म्हणजे सत्तेत येणाऱ्या पक्षांना कधी गळती लागत नाही. मंत्री पक्ष सोडत नाहीत, आमदार पक्ष सोडत नाहीत आणि प्रमुख कार्यकर्तेही पक्ष सोडत नाहीत. मात्र इथे पुर्ण परिस्थिती उलट दिसत आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, उत्तरप्रदेश आणि गोव्याचा राजकीय प्रवास हा परिवर्तनाच्या दिशेने सुरू आहे," असे राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT