New Delhi News : 'निवडणूक चिन्ह बदलण्याचा काहींचा कट आहे. पण चिंता करण्याची गरज नाही. कोणते बटण दाबून कुणाला मत द्यायचे, एवढी जनता सुज्ञ आहे', असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार गटासह भाजपवर हल्लाबोल केला आहे. नवी दिल्लीत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवार बोलत होते.
'केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय काहीही आला तरी चिंता करण्याची गरज नाही. निवडणूक चिन्ह महत्त्वाचे आहे. पण आपली लोकशाही प्रगत झाली आहे. निवडणूक चिन्ह बदलले तरी मतदार आपला निर्णय बदलत नाही', असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी यावेळी आपला अनुभव सांगितला. 'मी काँग्रेसचा (Congress) उमेदवार असताना पहिल्यांदा निवडणूक लढवली १९६७ मध्ये म्हणजे ५५ वर्षांपूर्वी. त्यावेळी बैल जोडी या निवडणूक चिन्हावर मी निवडणूक लढलो आणि जिंकून आलो.
तीन वर्षांनी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि दोन पक्षात विभागली गेली. त्यावेळी बैल जोडी हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले. मग नवीन चिन्ह आले चरखा. गांधीजींच्या चरखा चिन्हावर आम्ही निवडणूक लढवली आणि जिंकलो. यानंतर आणीबाणी आली. इंदिरा गांधींविरोधात देशात वातावरण निर्माण झाले. निवडणुकीत इंदिरा गांधी पराभूत झाल्या आणि काँग्रेस पक्षही पराभूत झाला. पुन्हा काँग्रेसमध्ये फूट पडली. पुन्हा नवीन चिन्ह घ्यावे लागले. गाय वासरू, नंतर हात हे चौथे चिन्ह होते आणि मग आमचे पाचवे चिन्ह घड्याळ होते. मी घड्याळाच्या चिन्हावर लढलो, हाताच्या चिन्हावर, गाय वासरू, बैल जोडीच्या चिन्हा लढलो. मात्र, निवडणुकीच्या निकालात कुठलाही बदल झाला नाही. निवडणूक चिन्ह बदलण्याचा काहींचा कट आहे. पण मत कुणाला द्यायचे हे जनतेला माहिती आहे. देशातील वातावरण बदलत आहे', असे शरद पवार म्हणाले.
'राष्ट्रवादी पक्ष, चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे. माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीवर तुमच्या सह्या आहेत. ७० जणांनी म्हणून माझ्या नावाचा प्रस्ताव दिला होता. यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्याच बाजूने लागेल', असे म्हणत शरद पवार यांनी अजित पवार गटाला ठणकावले.
'सरकार पाडून भाजपने (BJP) अनेक राज्यात सत्ता मिळवली. गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेशात भाजप कट रचून सत्ता मिळवली. केरळ, तामिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता नाही. मग कुठंय भाजपची सत्ता ? यामुळे देशाचा मूड बदलतोय आणि भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी जनतेचा विचार होत चालला आहे', असे पवार म्हणाले.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.