Sanjay Raut on Sansad Winter Session.
Sanjay Raut on Sansad Winter Session. Google
देश

Parliament Winter Session 2023 : केंद्र सरकार विरोधकांचं ऐकेनासं झालंय

अभिजीत घोरमारे

Nagpur News : संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या नवी दिल्लीत सुरू आहे. अधिवेशनाचं कामकाज सत्ताधाऱ्यांकडून अत्यंत मनमानी पद्धतीनं सुरू आहे. विरोधी पक्ष एखााद्या मुद्द्यावर बोलायला पुढं सरसावला तर त्यांची तोंडं बंद केली जात आहेत. त्यामुळं देशात लोकशाही आहे की हुकुमशाही हे कळेनासं झालय, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.

नागपूर येथे बुधवारी (ता. 13) प्रसार माध्यमांशी बोलताना राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अलीकडच्या काळात केंद्र सरकारची मुजोरी आणखीनच वाढलीय असं ते म्हणाले. प्रत्येक विषयात लोकशाही, कायदा, नियम, संविधानातील तरतुदी पायदळी तुडवायच्या हे जणू त्यांनी ठरवूनच टाकलय असं सरकारच्या वागण्यावरून दिसत असल्याचं राऊत म्हणाले.

एखादं विधेयक आणायचं असेल किंवा कोणताही महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर सभागृहात यापूर्वी चर्चा केली जायची. अलीकडच्या काळात ही प्रथाच भाजपनं बंद केलीय. विरोधकांचे शब्दही ते कानावर घेत नाहीत. निवडणूक आयोगावरील नियुक्तीचा मुद्दा, कायद्यातील दुरूस्तीचं विधेयक मन मानेल त्या पद्धतीनं तयार करून घेण्यात आलं आहे. त्याच मनमानी पद्धतीनं विधेयकं मंजूरही करून घेण्यात येत आहेत, असं राऊत म्हणाले.

सरकारनं लोकशाहीचे सर्व स्तंभ कमकुवत करण्याचा सपाटा लावलाय. भारतात लोकशाही धोक्यात आहे, हे आता परदेशातील राज्यकर्तेही सांगत आहेत. त्यानंतरही सरकारना लाज वाटत नाही, याचं आश्चर्य वाटत असल्याचं राऊत म्हणाले. राज्यसभा, लोकसभेत बहुमत आहे, हे मान्य आहे. परंतु या बहुमताचा वापर लोकहितासाठी करायचा असतो. केंद्र सरकार आपला अजेंडा राबविण्यासाठी या बहुमताचा वापर करीत असल्याचा घणाघात त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रातील सरकार मोठ्या चोरांना पाठिशी घालत आहे आणि राज्यातील सरकार त्याहीपेक्षा मोठ्या चोऱ्यांना. राज्यात सध्या नवाब मलिक यांच्यावरून वादंग निर्माण केलं जातय. परंतु त्यांच्यावर असेच आरोप आहेत, त्यांच्याबद्दल मौन का, असं राऊत म्हणाले. केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारचा हा ढोंगीपणा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले की, शिंदे गटाच्या शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांच्या धनुष्यबाणापेक्षा कमळ अधिक प्रभावी वाटत असेल, तर यातच त्यांचं सगळं उघडं पडलं. शिवसेनेकडून धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव घेण्यासाठी भाजपनं कारस्थान केलं. शिंदे गटाचं सगळेच ‘कमळाबाई’चे गुलाम आहेत. ते ‘कमळाबाई’च्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे नक्की आहे. त्यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबान मिळालं असलं तरी यापैकी कुणालाही निवडणुकीत डिपॉझिट वाचवता येणार नाही.

उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले सगळे पळून गेलेले उंदीर आहेत. बिळात लपलेले आहेत ते अद्यापही. त्यांना कोणी विचारतं नाही. कधी या बिळात, तर कधी त्या बिळात ते लपतात, असं राऊत यांनी नमूद केलं. गद्दारी आणि बंड यात फरक आहे. हा फरक खूप मोठा आहे. गद्दारांनी आपली तुलना शिवाजी महाराजांशी किंवा त्यांच्या मावळ्यांशी करू नये, असं ते म्हणाले. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीबाबत सांगताना राऊत म्हणाले, 19 तारखेला मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी बैठक होणार आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बैठकीसाठी जातील.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT