sanjay raut
sanjay raut sarkarnama
देश

ईडी, एनसीबीच्या अधिकाऱ्यांना 'कमळ' चिन्हावर उभे करा ; शिवसेनेचा चिमटा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : नुकत्याच लागलेल्या पोटनिवडणुकांच्या निकालावरून शिवसेनेनं आता भाजपवर टीकेचे बाण डागले आहेत. या निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपची पिछेहाट झाली. महाराष्ट्रातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली, तर महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा (shiv sena) उमेदवार संसदेत पोहोचला. या पोटनिवडणुकीत भाजपचा (bjp) अनेक ठिकाणी पराभव झाला. पराभवांवर पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपवर हल्लाबोल केला आहे.

''भाजपकडे आता त्यांच्या विचारांचे कार्यकर्ते फारसे उरले नसून, यापुढे त्यांनी ईडी, सीबीआय, आयटी, एनसीबीच्या अधिकाऱ्यांना पकडून 'कमळ' चिन्हावर उभे केले पाहिजे. अधःपतनास भाजप स्वतःच जबाबदार आहे. हिमाचल प्रदेशात भाजपची वाताहत झाली आहे. मंडी मतदारसंघासह तीन विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसने भाजपचा पराभव केला.फक्त मोदी नामाचा जप करून निवडणुका जिंकण्याचा काळ संपला आहे. लोकांना भेडसावणारे प्रश्न निवडणुकांचे निकाल बदलतात. हिंदी पट्ट्यांत भाजपविरोधी वातावरण आहे,'' असे शिवसेनेनं स्पष्ट केले आहे.

"दादरा-नगरच्या विजयाने शिवसेनेची, हिंदुत्ववाद्यांची,अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांची दिवाळी अधिक तेजोमय झाली. शिवसेना महाराष्ट्राबाहेर काय दिवे लावणार? असे प्रश्न ज्यांना पडत होते त्यांनी शिवसेना विजयाचे हे तेजस्वी दीप पाहायलाच हवेत. दादरा-नगर हवेलीचा विकास व भयमुक्त प्रदेश या धोरणानेच शिवसेना तेथे काम करील. शिवसेना शब्दाला, वचनाला जागणारा पक्ष आहे याची प्रचिती डेलकर कुटुंबास आणि दादरा-हवेलीच्या जनतेला आल्याशिवाय राहणार नाही. दादरा-नगर हवेलीचा विजय हा नुसता विजय नसून देशातील हुकूमशाही प्रवृत्तीस दे धक्का आहे. असे धक्के देशातील अनेक भागांत बसले आहेत,'' असे अग्रलेखात म्हटलं आहे.

"महागाईने लोकांच्या घरातील चुली विझल्या आहेत व लोकांनी महागाईविरोधात मतदान केले, असे हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितले. याचा स्पष्ट अर्थ असा की, फक्त मोदी नामाचा जप करून निवडणुका जिंकण्याचा काळ संपला आहे. लोकांना भेडसावणारे प्रश्न निवडणुकांचे निकाल बदलतात. हिंदी पट्ट्यांत भाजपविरोधी वातावरण आहे हेसुद्धा दिसते. महाराष्ट्रातील भाजपवाले एक तुणतुणे कायम वाजवत असतात, मोदींमुळे शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. त्यांच्यासाठी दादरा-नगर हवेलीचा शिवसेना विजय सत्यकथन करतोय,'' असे टोला अग्रलेखात लगावला आहे.

"महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला खासदार निवडून येण्याचा मान दादरा-नगर हवेलीच्या कलाबेन डेलकर यांना मिळाला आहे. मोहनभाई डेलकर हे दादरा-नगर हवेलीचे लोकनेते होते. सात वेळा निवडून आलेला एक खासदार प्रशासनाच्या हुकूमशाहीस कंटाळून आत्महत्या करतो ही देशाच्या लोकशाही आणि संविधानासाठी लाजिरवाणीच घटना होती,'' असे भाष्य शिवसेनेनं केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT