<div class="paragraphs"><p>shivaji maharaj statue</p></div>

shivaji maharaj statue

 

sarkarnama

देश

भाजपवाल्यांनो, बंगळुरूचे राजभवन गाठा, बोम्मईंचे सरकार घालवाच!

सरकारनामा ब्युरो

पुणे : कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची (shivaji maharaj statue) विटंबना आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून समाचार घेतला आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शिवरायांच्या कार्याचा गौरव करतात आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री विटंबनेची घटना किरकोळ म्हणतात हे ढोंग असल्याची टीका शिवसेनेनं (shivsena)केली आहे.

कर्नाटकातील शिवरायांच्या विटंबनेची घटना ही छोटी घटना असल्याचे वक्तव्य करून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रयत्न केला. शिवरायांचा अपमान ही किरकोळ किंवा छोटी घटना असेल तर मोठे काय? असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो", असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार बंगुळुरूमध्ये घडला. या घटनेचे पडसाद उमटताना दिसत असून, शिवसेनेनंही आता यावरून भाजपच्या भूमिकेबद्दल टीका केली आहे. ''काशीत शिवरायांचा सन्मान आणि बंगळुरूत अपमान हे चालणार नाही, हे ढोंग आहे. भाजपवाल्यांनो, बंगळुरूचे राजभवन गाठा, बोम्मईंचे सरकार आता घालवाच!", असं आवाहन शिवसेनेनं केलं आहे.

"राष्ट्रीय पातळीवर त्या शिवशाहीचा लोप झालेला दिसत आहे. शिवाजी महाराज परधर्मसहिष्णू होते. मग कर्नाटकसारख्या हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात शिवरायांचा अपमान, विटंबना होण्याचे कारण काय? पंतप्रधानांनी काशीस मांडलेला विचार चार दिवसांनीही बंगळुरूत पोहोचला नाही,''असे शिवसेनेनं म्हटलं आहे.

"फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शे-पाचशे जणांच्या भाजप शिवप्रेमींनी बंगळुरूत तळ ठोकूनच बसले पाहिजे व राजभवनात वारंवार जाऊन बोम्मई सरकार बरखास्तीची मागणी करत राहिले पाहिजे. तरच ते जातिवंत शिवप्रेमी, पण कर्नाटकात वेगळे व महाराष्ट्रात जगावेगळे अशी भाजपवाल्यांची एकंदरीत तऱ्हा दिसते. राज्य आणि देश शिवाजी महाराजांच्या विचारानेच चालवावा,'' असे अग्रलेखात म्हटलं आहे.

"उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे हिंदू मने चाळविण्यासाठी मोदी यांनी शिवरायांच्या नावाने भावनिक साद घातली. हे आता नेहमीचेच झाले आहे. बंगळुरूत शिवरायांचा अपमान झाला, त्याचे पडसाद महाराष्ट्रासह देशभरात उमटणे स्वाभाविक आहे, पण महाराष्ट्रातील भाजप पुढारी या विषयावर उसळून उठायचे सोडाच, पण सळसळ करायलाही तयार नाहीत. त्यांनी कागदी निषेधाचे बाण चालवले आहेत. ते ठीक, पण एरवी महाराष्ट्रात असे काही घडले की, राजभवनावर त्यांचे 'जथेच्या जथे' पोहोचतात व सरकार बरखास्तीची मागणी करतात. कर्नाटकातील घटनेनंतर हे का होऊ नये?", असा टोला अग्रलेखात भाजप नेत्यांना लगावला आहे.

  • शिवाजी महाराजांची विटंबना भाजपशासित राज्यात होते व मुख्यमंत्री बोम्मई यांना ती किरकोळ घटना वाटते हासुद्धा महाराजांचा अपमानच आहे", अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे.

  • बेळगावसह सीमा भागात 'जय भवानी जय शिवाजी' ही घोषणा द्यायला भाजप सरकारने बंदी घातली आहे.

  • बेळगाव महानगरपालिकेवरील शिवरायांचा भगवा झेंडा जबरदस्तीने खाली उतरवला आहे.

  • मनगुत्ती येथील शिवरायांचा पुतळा रातोरात जेसीबी लावून हटवला. हे सर्व कृत्य करताना दिल्लीतील भाजप पुढाऱ्यांना शिवरायांचे शौर्य आठवू नये याचे आश्चर्य वाटते.

  • 2014 साली मोदी महाराष्ट्रात मते मागायला आले तेव्हा शिवाजी महाराजांचे आशीर्वाद मोदींना आहेत अशा आशयाची पोस्टर्स व मोठे फलक सर्वत्र लागले होते.

  • लोकांनी त्यांना त्यामुळे मतदानही केले, पण नंतर शिवाजी महाराजांच्या विश्वासाचे कुठे पानिपत झाले ते समजलेच नाही.

  • शिवाजी महाराजांना फक्त निवडणुकीपुरते वापरून घेतले व सोडून दिले असेच लोकांना वाटते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT