New Delhi News : संविधानाच्या 75 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सलग दोन दिवस संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संविधानावर चर्चा सुरू आहे. शनिवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांनी संविधानावर बोलत असताना भाजपा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. काँग्रेस आणि भाजप खासदारांकडून एकमेकांवर करण्यात आलेल्या आरोप-प्रत्यारोपांनी संसदेतलं वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आले. त्यातही शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींनाच (Rahul Gandhi) टार्गेट केल्यानं मोठा गोंधळ उडाला. राहुल गांधी यांना तुमच्या आजी संविधान विरोधी होत्या का ? असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी(Shirkant Shinde) राहुल गांधींच्या टीकेचा समाचार घेताना इंदिरा गांधी ते महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यापर्यंत असं सगळंच काढलं. ते म्हणाले,महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला विजय हा संविधानाच्या ताकदीमुळे झाला असून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतासुध्दा सादर करू शकली नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी श्रीकांत शिंदेंनी संविधानावरुन भाजप आणि स्वातंत्र्यावीर सावरकरांवर आरोप करणार्या राहुल गांधींना थेट त्यांची आजी इंदिरा गांधींचा संदर्भ देत जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले,इंदिरा गांधींनीही सावरकरांचं कौतुक केलं आहे. इंदिरा गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सचिव पंडित बाखले यांच्या पत्राला प्रत्युत्तर देताना इंदिरा गांधींनीही लिहिलेल्या पत्रात सावरकरांचं कौतुक केलं होतं असा दाखला दिला.
श्रीकांत शिंदेंनी संसदेच्या सभागृहातच संबंधित पत्राचं वाचन केलं. याचवरुन त्यांनी राहुल गांधींची कोंडी करताना आता तुमची आजीही संविधानविरोधी होती का? असा खोचक सवाल केला. तसेच याच संविधानामुळेच आज आम्ही संसदेत बसलो आहोत. याच संविधानाने सर्वसामान्य कुटुंबातील नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवले. तसंच, सामान्य रिक्षाचालकाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवले अशी आठवणही खासदार शिंदेंनी करुन दिली.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी श्रीकांत शिंदेंचं भाषण थांबवण्याचा प्रयत्नही केला .पण त्यांनी त्यांचं भाषण सुरूच ठेवले. शिंदेंनी आपल्या भाषणात आणीबाणीच्या काळावरूनही काँग्रेसला धारेवर धरले. ते म्हणाले,आणीबाणीच्या काळात विरोधक, जनता, न्यायाधीश असे कोणीही सुरक्षित नव्हते.
शिंदेंनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगमोहन लाल सिन्हा यांनी इंदिराजींना निवडणुकीतील हेराफेरीप्रकरणी अपात्र ठरवण्याचा निर्णय दिल्याची आठवण करुन देताना राहुल गांधींना डिवचलं. सिन्हा यांचा हा निर्णय रोखण्यासाठी अनेक असंवैधानिक डाव टाकण्यात आले. अलाहाबादच्या मुख्य न्यायमूर्तींना डेहराडूनहून बोलावण्यात आले.
तसेच हा निर्णय जुलैपर्यंत पुढे ढकलण्यासाठी गृहमंत्रालयाच्या सचिवांकडून दबाव आणण्यात आला.न्यायाधीशांच्या पीएला धमक्या देण्यात आल्याचंही त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संविधानावर भाष्य करतानाच भाजपा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, भाजपच्या लोकांकडून जिथं जाईल तिथे द्वेष पसरवणं सुरू आहे. भाजपच्या लोकांकडून दिवसातले 24 तास संविधानावर हल्ला करणं सुरू असून आम्ही सर्व मिळून संविधानाचे रक्षण करतोय, अशा आमच्या इंडिया आघाडीची विचार आहे.
तर दुसरीकडे आपल्या भाषणाची सुरुवात करताना त्यांनी एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात मनुस्मृतीची प्रती घेत सावरकरांनी या दोन्ही ग्रंथाबद्दलचे काय विचार मांंडले होते,हे सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.