Karnataka CM Political Controversy News : कर्नाटक राज्यात नुकताच काँग्रेसच्या सत्तेत बदल झाला असून, सिद्धरामय्या यांना हटवून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. यानंतर या गोष्टीला तीन-एक महिने होणार आहेत. या दरम्यान उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्या मोठ्या दाव्यामुळे पुन्हा एकदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा विषय चर्चेत आला आहे. परमेश्वर यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावाची काँग्रेस हायकमांडकडे शिफारस केली होती. मात्र, हायकमांडची योजना वेगळी असल्याने तसे घडले नाही, असा दावा केला आहे. या दाव्यामुळे आता पुन्हा एकदा कर्नाटकचे राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकमध्ये नवे सरकार झाले असून, या गोष्टीला आता तीन-एक महिने होतील. दरम्यान इच्छुकांचे बंड, मोर्चेबांधणीसह विविध कारणांनी शिवकुमार यांच्यासमोर स्वकीयांनी आव्हान निर्माण केले होते. ही सर्व आव्हाने दूर करत त्यांनी सत्ता आपल्या हातात घेतली. यानंतरदेखील काँग्रेस आणि त्यांच्यासमोर असलेली आव्हाने कमी झाली नसून, भाजप आणि विरोधकांनी डोकेदुखी वाढवून ठेवली आहे.
महर्षी वाल्मीकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातील कथित घोटाळ्याप्रकरणी मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्यावरून आता वाद सुरू झाला आहे. एकीकडे नागेंद्र यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे या वृत्ताचे खंडन नागेंद्र यांच्या कार्यालयाने केले आहे. यामुळे सध्या कर्नाटकच्या राजकारणात मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.
याचदरम्यान उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी राज्यातील खांदेपालटावरून भाष्य केलं आहे. बंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना परमेश्वर यांनी, ‘परमेश्वर यांना उपमुख्यमंत्री कोणी केले?’ यावर उत्तर दिले. ते म्हणाले, ‘सिद्धरामय्या आणि मी अनेक वर्षांपासून एकत्र काम करत आलो आहोत. मी तब्बल आठ वर्षे प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होतो. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून सहभागी झालो. २०२३ मध्येही त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आम्ही दीर्घकाळ एकत्र काम केल्यामुळे त्यांना माझ्याबद्दल चांगली माहिती आहे.’
सिद्धरामय्या यांनी माझ्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी शिफारस केली होती, त्याबद्दल मला कोणतेही आश्चर्य वाटले नाही. मात्र, हायकमांडची योजना वेगळी असल्याने तसे घडले नाही, असे ते म्हणाले. तसेच राज्यात नव्या मंत्रिमंडळात त्यावेळी चार-पाच उपमुख्यमंत्री नेमण्याचीही योजना होती. मात्र, केवळ एका व्यक्तीला उपमुख्यमंत्रिपद द्यावे, असे सिद्धरामय्या यांनी सुचवून माझ्या नावाची हायकमांडकडे शिफारस केली, असेही परमेश्वर यांनी स्पष्ट केले.
तसेच परमेश्वर पुढे म्हणाले की, केंद्राच्या २०२० च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच दुष्काळग्रस्त भाग घोषित करावे लागतात. सध्या १०२ तालुक्यांबाबत नियमानुसार अहवाल प्राप्त झाले असून, तेथील परिस्थितीचा अभ्यास केला आहे. या महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करून केंद्र सरकारकडे अधिकृत प्रस्ताव पाठविण्यात येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.