Caste Census Sarkarnama
देश

Jairam Ramesh : आर्थिक, राजकीय संकटानंतरही श्रीलंकेत जनगणना; पंतप्रधान, भारतात का विलंब करत आहेत?

Rajanand More

New Delhi : श्रीलंकेत राजकीय परिवर्तन झाल्यानंतर जनगणनेचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी व एनडीए सरकारवर निशाणा साधला आहे. भारतात जनगणना का लांबवली जात आहे, असा सवाल काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश हे सातत्याने जनगणनेच्या मुद्यावरून सरकारवर टीका करत असतात. त्यांनी सोमवारी ‘एक्स’वर पोस्ट करत पंतप्रधानांना सवाल केला आहे. राजकीय परिवर्तन आणि आर्थिक संकटांच्या मध्यात असलेल्या श्रीलंकेने नुकतेच जनगणनेला सुरुवात होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांची शेवटची जनगणना 2012 मध्ये झाली होती. पण भारताचे काय, असा सवाल जयराम रमेश यांनी केला आहे.  

2021 मध्ये दशवार्षिक जनगणना होणे आवश्यक होते. तरीसुद्धा अद्यापही ती होण्याची कोणतेही चिन्हे दिसत नाहीत. 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीचा वापर सुरू असल्यामुळे 10 कोटींहून अधिक भारतीयांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 किंवा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत लाभ मिळत नाहीत, असा दावाही त्यांनी केला आहे.

जाति बाबतचे प्रश्न जनगणनेत समाविष्ट करण्याबाबत काय, अशी विचारणा करत जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, काँग्रेस आणि इतर सर्व राजकीय पक्षांकडून याची सातत्याने मागणी होत आहे. 1951 पासून प्रत्येक दहा वर्षांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची सविस्तर जनगणना होत आहे.

आता त्याचप्रमाणे ओबीसी आणि इतर जातींची सविस्तर गणना करणे आवश्यक आहे. जातिनिहाय जनगणनेद्वारेच शिक्षण आणि रोजगारात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची पूर्तता होऊ शकते. पंतप्रधान जातगणना समाविष्ट असलेली जनगणना का लांबवित आहेत, असा सवाल जयराम रमेश यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT