supreme court sarkarnama
देश

घटनेच्या ठिकाणी हजारो लोक, मग 23 साक्षीदारच कसे? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर 18 ऑक्टोबरला आणखी एका भाजप नेत्यासह चौघांना गडाआड केले आहे. मात्र, या प्रकरणाच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे.

या प्रकरणाची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याच्या मागणीच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. यावेळी उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने हरीश साळवे म्हणाले की, 30 साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले असून त्यापैकी 23 घटनेच्या ठिकाणी होतेत. त्यावर सरन्यायाधीश यांनी उलट प्रश्न केला.

शेतकरी मोर्चामध्ये हजारो शेतकरी असताना त्यात केवळ तेवीसच साक्षीदार कसे मिळाले, असा सवाल सरन्यायाधीशांनी केला. त्यावर साळवे यांनी आम्ही जाहिरात देऊन साक्षीदारांनी पुढे येण्याचे आवाहन केल्याचे सांगितले. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, त्याठिकाणी चार ते पाच हजार लोक होते. ते स्थानिक होते. घटनेनंतरही मोठ्या संख्येने लोक होते, जे चौकशीची मागणी करत होते.

दरम्यान, मागील सुमावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, हा अहवाल थेट आजच मुदत संपताना सादर करण्यात आला. यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालय म्हणाले होते की, काल रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहत होतो की आम्हाला अहवाल मिळेल. परंतु, अखेरच्या क्षणी तुम्ही अहवाल हाती दिला आहे. तो आम्ही वाचणार कधी? तुम्ही किमान एक दिवस आधी तरी तो सादर करायला हवा होता.

उत्तर प्रदेश सरकारच्या अहवालाचाही न्यायालयाने चिरफाड केली. न्यायालय म्हणाले की, तुम्ही केवळ 4 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणात 44 साक्षीदार असताना फक्त चौघांचे जबाब नोंदवण्यात आले. आणखी जबाब का नाहीत? किती आरोपी पोलीस कोठडीत आणि किती न्यायालयीन कोठडीत? पोलीस चौकशी करीत नाहीत तोपर्यंत आम्हाला माहिती मिळणार नाही. हे प्रकरण अनुत्तरीत गोष्टीसारखे होऊ नये. पोलिसांना साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सांगा आणि साक्षीदारांची सुरक्षितता अतिशय महत्वाची आहे.

लखीमपूर खीरी येथे 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली असून, त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. आशिष मिश्रासह लव कुश, आशिष पांडे आणि भारती या चौघांना अटक झाली आहे. पोलिसांनी आता स्थानिक भाजप नेता सुमित जयस्वाल याच्यासह शिशुपाल, नंदन सिंह बिष्ट आणि सत्य प्रकाश त्रिपाठी यांना अटक केली आहे. लखीमपूर पोलिस आणि गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT