Supriya Sule, Ajit Pawar Sarkarnama
देश

Supriya Sule On Ajit Pawar : अमित शाहांचं कौतुक, अजितदादांना टोमणा, तर फडणवीसांवर टीका; काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Sunil Balasaheb Dhumal

Delhi Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला वारंवार हिणवले आहे. जलसिंचन, राज्य शिखर बँकेच्या घोटाळ्यावरून राष्ट्रवादीला घेरण्याचा भाजपने वारंवार प्रयत्न केला आहे. उपमुख्यमंत्री सत्तेत सहभागी झाल्यानंतर पावसाळी आणि आताच्या विशेष अधिवेशनात भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोदींनी विरोधकांवर टीका केली. याला सडेतोड उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळेंनी हिंमत असेल, तर जलसिंचन आणि शिखर बँकेतील घोटाळ्यांची चौकशी करावी, असे मोदींना आवाहन करत अजित पवारांवर टीका केलेली आहे. महिला सक्षमीकरणावरूनही सुळेंनी अजितदादांना टोला लगावला आहे. (Latest Political News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

संसदेच्या विशेष अधिवेशनातील तिसऱ्या दिवशी बुधवारी महिला आरक्षण विधेयकांवर जोरदार चर्चा सुरू होती. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) निशिकांत दुबे विधेयकावरील चर्चेत सहभागी होण्यासाठी उभे राहताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केला. विधेयकावर एकही महिला खासदार बोलत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, बहिणींचे सक्षमीकरण होत असताना भावांनाही बोलले पाहिजे. पुरुषांनीही स्त्रियांच्या अधिकारांबाबत विचार केला पाहिजे. हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुळेंनी अजित पवारांना टोमणा मारला आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महिला सुरक्षिततेवरून समाचार घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी अधिकारीपदी सुप्रिया सुळेंची (Supriya Sule) नियुक्ती केल्यानंतर पक्षात बंड झाल्याची चर्चा आहे. अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन ते सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्री झाले. या घटनाक्रमाचा आणि महिला सक्षमीकरणावरील अमित शाह यांच्या विधानांचा संबंध जोडत नाव न घेता खासदार सुळेंनी अजित पवारांना टोला लगावला.

सुळे म्हणाल्या, "अमित शाह बहिणींसाठी झटतात हे पाहून बरे वाटले. पण प्रत्येक बहिणीच्या नशिबात असे होत नाही. एक भाऊ बहिणीचे कल्याण पाहू शकतो, असे प्रत्येक बहिणीबाबत होत नाही. समाजाची सायकल चालण्यासाठी महिला आणि पुरुष समानच असावेत. देशातील महिलांवर पुरुषांचा जास्त प्रभाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला. महात्मा फुलेंनी महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला. राजीव गांधीच्या नेतृत्वात शरद पवारांनी राज्यात प्रथमच महिलांना आरक्षण दिले."

आरक्षणाची चर्चा होत असली तरी देशातील महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष वेधत सुळेंनी देशातील भाजप आणि राज्यातील उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. "महिलांच्या स्थितीवरूनच देशाची प्रगती समजते, असे जवाहरलाल नेहरू म्हणाले होते. देशात महिलांवरील हल्ले वाढले आहेत. हे प्रकार थांबले पाहिजेत. महाराष्ट्रात हे प्रमाण जास्त आहे. राज्यात भाजपचे गृहमंत्री आहेत. मात्र, महिलांवरील अत्याचाराचे वाढलेले प्रकार थांबावावेत, याकडे भाजप सरकारने लक्ष द्यावे," असे आवाहन सुळेंनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT