mk stalin
mk stalin sarkarnama
देश

राजीव गांधींच्या खुन्यांचा सन्मान करून स्टॅलिन यांनी काय साध्य केले, शिवसेनेचा सवाल

सरकारनामा ब्युरो

पुणे : माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) हत्या खटल्यातील आरोपी असलेला एजी पेरीवलान (perarivalan) याची सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच सुटका केली आहे. कारागृहातून सुटका होताच एजी पेरीवलान याने थेट तमिलनाडुचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (mk stalin) यांची भेट घेतली. यावरुन मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली होती.

आता शिवसेनेने देखील स्टॅलिन यांच्यावर 'सामना'तून टीकेचे बाण सोडले आहेत. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला आवर्जून उपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यावर शिवसेनेची घणाघाती टीका केली.

"राजीव गांधींच्या खुन्यांचा सन्मान करून एम.के. स्टॅलिन यांनी नेमके काय साध्य केले? राजीव गांधी यांची हत्या हा धक्काच होता, पण गांधींच्या खुन्यांचा सन्मान हा त्यापेक्षा मोठा धक्का आहे. राजकारणासाठी ‘वाट्टेल ते’ हे प्रयोग कधी थांबणार? नव्हे, ते थांबायलाच हवेत," असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

स्टॅलिन यांनी पेरीवलानचा सन्मान केला. पेरीवलान याचा उल्लेख स्टॅलिन यांनी ‘भाई’ असा केला. पेरीवलानला उत्तम भविष्य असल्याचे विधान स्टॅलिन यांनी करावे हे आश्चर्यच आहे. तामीळनाडू काँग्रेस व डीएमके पक्षाची युती आहे हा भाग वेगळा, पण देशाच्या माजी पंतप्रधानांच्या हत्या प्रकरणातील आरोपीस असे मिठी मारून भेटणे, त्याचा सन्मान करणेकोणत्या राजकीय संस्कृतीत बसते? असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

पंजाबात एकेकाळी अनेकांची हत्या करणाऱ्या खलिस्तानवाद्यांचे सन्मान केले जात असत, पण इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिरातच रणगाडे घुसवून अतिरेक्यांचा बीमोड केला. राजकारणात सध्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घुसले आहेत व त्यांना मानसन्मानही दिला जातो. अगदी मंत्रीपदावरही ते विराजमान होत आहेत, पण देशाच्या पंतप्रधानांची हत्या करणाऱ्या आरोपीचा सन्मान करणे हा प्रकार भयंकर आहे, असे शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे.

पंतप्रधानांच्या खुन्यांना प्रतिष्ठा देणे हा घातक पायंडा आहे. पंतप्रधान मोदी यांनीही या नव्या पायंडय़ाला विरोध करायला हवा, राजकारण कितीही अमानुष असले तरी किमान सभ्यता व सुसंस्कृतपणा टिकवायलाच हवा. दुर्दैवाने आज तसे घडताना दिसत नाही, अशी खंत अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे.

राजीव गांधी यांची हत्या ज्या बॉम्बस्फोटात झाली तो बॉम्ब बनवण्यामध्ये ९ वोल्टच्या दोन बॅटरीज वापरण्यात आल्या होत्या ज्या पुरवण्याचा आरोप या पेरीवलान यावर होता. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर २० दिवसांनी त्याला अटक करण्यात आली होती. तब्बल ३१ वर्षे हा खटला सुरु होता. तो सुटल्याबरोबर मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या भेटीस गेला. दोघांनी गळाभेट घेतली. यावरुन सध्या राजकारण तापलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT