KCR Sarkarnama
देश

Telangana Assembly Elections Results 2023 : तेलंगणात गुलाबी वादळ शमणार; केसीआर सत्तेबाहेर जाणार ?

प्रसाद जोशी - Guest Sarkarnama

Telangana Election 2023 : तेलंगणात मागील दोन टर्म सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हॅटट्रिक साधण्याचे स्वप्न भंगणार असल्याचे दिसून येत आहे. तेलंगणात सध्या हाती येत असलेल्या आकड्यांनुसार सत्ताबदलाचे संकेत मिळत आहेत. केसीआर गजवल आणि कामारेड्डी या दोन्ही मतदारसंघांतून पिछाडीवर असल्याचे आकडे सांगतात.

दरम्यान, मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्येही काँग्रेसच्या विजयाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानुसारच आता मतमोजणीत केसीआर यांच्या बीआरएसवर पराभवाचे सावट आहे, तर काँग्रेसला नवसंजीवनी मिळल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.

सत्ताविरोधी कौल प्रभावी

आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा या स्वतंत्र राज्याची निर्मितीसाठी, तेलगू देसम पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव यांनी २००१ मध्ये पक्षातून बाहेर पडून तेलंगणा राष्ट्र समितीची (टीआरएस) स्थापना केली. अखेर २०१४ मध्ये तेलंगणा राज्याची निर्मिती झाली. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये विक्रमी बहुमत मिळवत टीआरएस सत्तेत आली. तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान के. चंद्रशेखर राव यांना मिळाला. त्यानंतर २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीतही तेलंगणा राष्ट्र समितीने बहुमत मिळवत सत्ता मिळवली.

तेलंगणामध्ये मिळालेल्या यशानंतर के. चंद्रशेखर राव यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या. त्यांनी शेजारील राज्यात विस्तार करण्याचे ठरवले. यासाठी २०२२ मध्ये तेलंगणा राष्ट्र समिती या आपल्या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती (बीआरएस) असे केले. मात्र, दोन टर्म सत्ता उपभोगलेल्या पक्षाविषयी निर्माण झालेला सत्ताविरोधी कौल थोपवण्यात केसीआर अयशस्वी ठरले, असेच सध्या म्हणण्याची वेळ आली आहे.

नोकरभरती नाही

तेलंगणामध्ये केसीआर यांच्या नेतृत्वाखाली बीआरएस सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या. विशेषत: शेतकऱ्यांना एकरी १० हजार अनुदान देण्याची योजनेची सर्वत्र चर्चा झाली. ही योजना महाराष्ट्रातही लागू करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत होती. मात्र, शेतकरी योजना, महिलांना मदत यांसारख्या कल्याणकारी योजना राबवताना युवा वर्गासाठी मात्र नोकरभरती झालीच नाही. याचाही मोठा फटका पक्षाला बसला.

रेवंत रेड्डींचे नेतृत्व प्रभावी

ज्येष्ठ काँग्रेस नेते स्व. एस. जयपाल रेड्डी यांचे भाचे जावई असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवलेल्या कॉंग्रेसने दक्षिण भारतात मोठे यश मिळाले आहे. तेलुगू देसम पक्षाचे नेते असलेले रेवंत रेड्डी हे २०१६ मध्ये कॅश फॉर वोट प्रकरणात रंगेहाथ पकडले होते. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मलकाज गिरी या मतदारसंघातून विजय मिळवला. पक्षाने २०२१ मध्ये प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नेमणूक केली. राहुल गांधी यांनी ठरवलेला विश्वास रेवंत रेड्डी यांनी सार्थ ठरवला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT