देश

Telangana Election Results 2023 : केसीआर यांच्या धावत्या कारला ब्रेक...

Anand Surwase

Telangana News : तेलंगणा निर्मितीनंतर पाणी, निधी आणि रोजगार याचे आश्वासने देत सत्तेत आलेल्या केसीआर यांनी 2023 च्या निवडणुकीमध्येदेखील तेच मुद्दे कायम ठेवले आहेत. तसेच सत्तेत असताना जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या, परंतु या योजनांच्या भरोशावर निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या बीआरएसला तेलंगणामध्ये मोठा झटका बसला आहे. मुख्यमंत्री केसीआर यांच्या धावत्या कारला ब्रेक लावत मतदारांनी काँग्रेसच्या हातात तेलंगणाची सत्ता सोपवली आहे.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी मतमोजणी होत असून, सर्व 119 जागांचे कल हाती आले आहेत. त्यामध्ये काँग्रेसला 63 जागांवर आघाडी मिळाली आहे, तर केसीआर यांच्या बीआरएसला 40 जागांवर आघाडी मिळाली आहे. या निवडणुकीत भाजपनेही चांगली कामगिरी केली असून, सध्या भाजपला 9 जागांवर आघाडी मिळाली, तर एमआयएमला 6 आणि अन्य 1 जागा असे सध्याचे चित्र आहे. जनमताचा कल पाहिला असता जनतेने बीआरएसच्या विविध योजनांकडे दुर्लक्ष करत काँग्रेसला संधी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाळण्यापासून वैकुंठापर्यंत योजना

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी मुख्यमंत्री म्हणून दोन्ही टर्ममध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी बरीचशी कामे केली, विजेची उपलब्धता यावर भर दिला. यासह सर्व सामान्य जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना लागू केल्या. त्यामध्ये गर्भवती महिलांसाठी केसीआर पोषण किट, मुलीच्या विवाहासाठी कल्याण लक्ष्मी योजना, शेतकऱ्यांसाठी रायतू बंधू योजना, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी, विधवा महिलांसाठी , विणकर, बीडी कामगार यांच्यासह एड्सग्रस्त रुग्णांसाठी आसरा पेन्शन योजना ही सुरू केल्या. दलितांना अर्थसाहाय करण्यासाठी दलित बंधू नावाची योजना सुरू करण्यात आली. एवढेच नाही तर प्रत्येक गावाला स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याचाही निर्णय केसीआर यांनी घेतला होता. मात्र, त्यांच्या या योजनांना भेदाभेद आणि प्रातिकवादांची किनार लाभल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता.

प्रादेशिक वाद

तेलंगणाचे उत्तर आणि दक्षिण तेलंगणा असे दोन प्रादेशिक विभाग आहेत. तेलंगणातील कालेश्वरमसारखा जल प्रकल्प, तसेच मोठ मोठे उद्योग व्यवसाय हे उत्तर तेलंगणात स्थिरावले आहेत. त्यामुळे दक्षिण तेलंगणातील जनतेमध्ये केसीआर सरकारकडून सापत्न वागणूक दिल्याची भावना होती. विकासाच्या निधी वाटपामध्ये असमानता होत असून, दक्षिण तेलंगणातील जनता या प्रादेशिक अन्यायाच्या मुद्द्यावरून नाराज होती. काँग्रेसने निवडणुकीत प्रचारासाठी हेच मुद्दे उचलून धरले, त्यामुळे दक्षिण कर्नाटकातील जनतेला अधिक बळ मिळाले, या शिवाय सरकारकडून विविध योजना दिल्या जाहीर केल्या जात असल्यातरी त्या योजनांचा अनेक मागासवर्गीय जाती जमांतीना लाभ मिळत नव्हता, आदिवासी समाजाच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या. त्यातच यापूर्वी मुख्यमंत्री केसीआर हे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नियमित बैठकीचे आयोजन करत होते. मात्र, त्या बैठका ही त्यांनी बंद केल्या होत्या. त्यामुळे जनतेमध्ये केसीआर यांच्याबद्दल नाराजी होती.

केसीआर विरोधात काँग्रेस आक्रमक

तेलंगणामध्ये के चंद्रशेखर राव यांनी जनतेसाठी विविध योजना लागू करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्या पार्टीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले. कालेश्वरम प्रकल्प, तेलंगणातील गृह प्रकल्प यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. त्यासोबत काँग्रेसने भ्रष्टाचार, बेरोजगारी, परिवारवाद फार्म हाऊसमधून सरकार चालवणे, या मुद्द्यांना पुढे करत जनतेमध्ये केसीआर यांच्या विरोधात वातावरण निर्मिती केली होती. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून केसीआर यांच्या धरणी पोर्टल, कालेश्वरम सिंचन घोटाळा या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर जोरदार प्रचार केला. याशिवाय बीआरएस पहिल्या निवडणुकीत जी आश्वासन दिली होती. त्याच मुद्द्यावर निवडणुका लढत आहेत. त्यांनी दिलेली आश्वासने आजही पूर्ण झालेली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला. तेलंगणा राज्याचा दर्जा मिळुन 10 वर्षे झाली तरीही जनतेच्या मूलभूत गरजा कायम आहेत. राज्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. बेरोजगारी वाढत असल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसने लक्ष वेधले होते. या आक्रमक प्रचाराचा जनतेमध्ये मतपरिवर्तन घडवण्यास फायदा झाल्याचे आजच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसच्या 6 गॅरंटीचा प्रभाव

कर्नाटकात सत्तेत येण्यासाठी वापरलेला तोच फार्म्युला काँग्रेसने आता तेलंगणात ही वापरला आहे. काँग्रेसने या ठिकाणी जनतेला 6 आश्वासने दिली आहेत. महालक्ष्मी" रायतु भरोसा, गृहज्योती, इंदिराम्मा हाऊस", युवा विकास आणि जेष्ठांना पेन्शन आणि विमा या गॅरंटीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सत्तांतर झाले तरी जनतेला मिळणाऱ्या योजनांमध्ये फारसा बदल होणार नाही, याचीही खात्री जनतेला होती. अखेर केसीआर सरकारला कंटाळलेल्या जनतेने या निवडणुकीमध्ये काँग्रेसला संधी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT