Vijay CM Oath Ceremony : तामिळनाडूच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. तमिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि तमिळगा वेत्री कझमगचे (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी आज (दि. १० मे) तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नई येथील नेहरू स्टेडियम येथे हा शपथविधी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
विजय यांच्या शपथविधीवेळी पक्षाचे हजारो कार्यकर्ते व त्यांचे चाहते उपस्थितीत होते. याशिवाय कॉंग्रेसचे जेष्ठे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील मंचावर शपथविधी सोहळ्यासाठी आवर्जुन उपस्थितीत राहिले. तसेच प्रमुख पाहुण्यांमध्ये विजय यांचे आई-वडील आणि विजय यांची कथित प्रेयसी व अभिनेत्री त्रिशा कृष्णन हजर होते. त्या या सोहळ्यातील विशेष पाहुणी म्हणून उपस्थित राहिल्या. सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्वांच्या नजरा त्रिशाच्या उपस्थितीकडे खिळल्या होत्या.
परंतु विजय यांच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी संगीता सोरनलिंगम आणि दोन्ही मुलांनी पाठ फिरवल्याचे दिसले. तिघेही या सोहळ्याला अनुपस्थित होते. काही महिन्यांपूर्वीच विजय यांच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जात संगीताने एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विजय यांचे प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अभिनेत्री त्रिशा व विजय यांच्यातील नाते अधिक चर्चेत आले.
विजय यांच्या TVK पक्षाने तमिळनाडूच्या राजकारणात इतिहास घडवला आहे. डीएमके आणि एआयएडीमके या दोन मोठ्या पक्षांवर मात करत विजय यांनी मोठा विजय संपादन केला आहे. तमिळनाडूतील रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये, चौकाचौकात सध्या विजय यांच्या नावाचा जयघोष होत असताना विजय यांची पत्नी संगीता व मुलांची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नव्हती. मुख्यमंत्री पदाची शपथ घेणे हा विजय यांच्या आयुष्यातील सर्वाधिक अनमोल क्षण होता. या सोहळ्यालाही पत्नी व मुले अनुपस्थितीत राहिली. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण झालं असलं तरी संगीता आणि मुलं विजय यांच्यापासून दुरावल्याचं स्पष्ट दिसत आहे.
मुलगा जेसन संजय याने विजय यांना खूप आधीच सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचं सांगितलं जातं. मुलगी दिव्या साशानेही वडिलांच्या विजयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ती बॅडमिंटनपटू आहे. थलपती विजय यांची पत्नी संगीतानेही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे थलपती विजय हे जरी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत 'किंग' ठरले तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र ते हरले आहेत, अशी भावना व्यक्त होत आहे.