Goa News : लोकसभा निवडणुकीच्या निकालास पाच दिवस (4 जून) बाकी आहेत. प्रत्येक दिवस निकालाजवळ घेऊन जात आहे, तशी उमेदवार, नेत्यांची उत्कंठा आणि हुरहूर वाढते आहे. यासंदर्भात त्यांचे रोचक अनुभव आहेत. मतदानानंतर कसे गेले दिवस? रात्रीच्या झोपेचे काय? मनातील विचारांचे काहूर आणि निवडून आल्यास पहिले कशाला असेल प्राधान, याचा गोव्यातील (Goa) उमेदवारांचा मांडलेला धांडोळा!
लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) जाहीर झाल्यानंतर मी, कार्यकर्ते व पक्ष प्रचारात सहभागी झालो. मतदानानंतर आढावा घेण्यासाठी आम्ही लोकांच्या पुन्हा गाठीभेटी घेतल्या. या काळात लोकांची मते जाणून घेतली. त्यातून लोकांनी सहाव्यांदा मला व भाजपला आशीर्वाद दिल्याचे अधोरेखित झाले आहे. यावर निकालादिवशी शिक्कामोर्तब होईलच, असे भाजपचे (BJP) उत्तर गोवा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी सांगितले. राहिला प्रश्न उत्कंठतेचा तर, आम्ही सकारात्मक आहोत. अजूनही जनसंपर्क चालूच आहे. निवडून आल्यानंतर गोव्यात युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याला पहिले प्राधान्य देणार आहे. तसेच गोव्यातील इतर प्रश्न व अडचणी सोडविण्यावर भर राहील, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मतदानानंतर आढावा घेतला. तसेच कार्यकर्ते, नेतेमंडळी आणि लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. यातून आमचा विजय निश्चित आहे. निकालाची उत्कंठा माझ्यापेक्षा कार्यकर्त्यांना अधिक आहे. उत्तरेतून काँग्रेस (Congress) शंभर टक्के बाजी मारणार यात कुठलाही वाद नाही, असे काँग्रेसचे उत्तर गोवा उमेदवार रमाकांत खलप यांनी सांगितले. झोप निवांत लागते. विजयाची खात्री आहे. तसेच उत्तरेतून केवळ एकमेव विधानसभा आमदार काँग्रेसचा आहे. उर्वरित सत्ताधाऱ्यांचे आहेत. अशा परिस्थितीत मी हे अग्निदिव्य नक्की पार करीन. चटका बसेल; परंतु यशाचा भरवसा आहे, असे रमाकांत खलप यांनी सांगितले.
निकालाचा मनावर कसलाही दबाव किंवा चिंता नाही. मतदानात लोकांनी जो जोश व उत्साह दाखविला, आपल्यावर प्रेमाचा वर्षाव केला ते पाहता माझाच विजय होईल. लोकांना केवळ ‘ईव्हीएम’बद्दल (EVM) शंका आहे. लोकांचा त्यावर विश्वास नसेल तर, लोकशाही धोक्यात आहे, असेच म्हणावे लागेल, असे इंडिया आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले. नद्यांचा राष्ट्रीयीकरणापासून बचाव व म्हादई नदी सांभाळण्याला प्राधान्य आहे. तसेच जमीन संपादन कायद्यामध्ये बदल करून गोव्याच्या जमिनींचे रक्षण करायचे आहे.
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) विजयी झाल्यानंतर आम्ही पाणी, वीज आणि रस्ते या मूलभूत विषयांना प्राधान्य देणार आहोत, असे सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या नोकऱ्यांची पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत. ही पदे गोमंतकीयांना मिळणार याची खात्री आम्ही करून घेणार आहोत, असा दावा बोरकर यांनी केला. प्रचारादरम्यान आम्हाला अनुभव आला की, भाजपच्या कार्यकाळात जनता त्रस्त आहे. बेकारी, महागाईसारख्या ज्वलंत समस्या शिखरावर आहेत. सरकारकडून जनतेसाठी काहीही केले जात नसल्याची भावना तीव्र आहे, असे वीरेश बोरकर यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.