Sharad Pawar and Ajit Pawar :  Sarkarnama
देश

NCP Crisis : शरद पवार विरुद्ध अजितदादा; निवडणूक आयोगातील सुनावणी संपली; सोमवारी होणार फैसला ?

Ganesh Thombare

Delhi News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षचिन्हाच्या वादावर शुक्रवारी निवडणूक आयोगात सुनावणी झाली. या सुनावणीला पक्षाध्यक्ष शरद पवार हे स्वतः उपस्थित होते. अजित पवार यांच्याबाजूने कोणीही उपस्थित नव्हते. शरद पवारांकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तर अजित पवार यांच्याकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह युक्तिवाद केला.

सोमवारी पुन्हा सुनावणी होणार

राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हाच्या वादावर शुक्रवारी निवडणूक आयोगात सुनावणी झाली. या सुनावणीत दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता पुढची सुनावणी येत्या सोमवारी दुपारी चार वाजता होणार आहे. त्यामुळे आता सोमवारी होणाऱ्या सुनावणीत काय फैसला होतो, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

वकील अभिषेक मनू सिंघवी काय म्हणाले ?

राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हाच्या वादावर निवडणूक आयोगात तब्बल दोन तास सुनावणी झाली. राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हाच्या वादावर निवडणूक आयोगातील सुनावणी झाल्यानंतर वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी प्रतिक्रिया दिली.

सिंघवी म्हणाले, "आज दोन तास सुनावणी झाली. आम्ही दोन महत्वाचे मुद्दे मांडले. आम्हाला न ऐकता पक्षात वाद आहे हे सिद्ध करु नका. दुसऱ्या गटाचा युक्तिवाद संपला तेव्हा आम्हाला बाजू मांडण्याची संधी मिळेल. कोणीही खोटे पुरावे घेऊन पक्षावर दावा करु शकत नाही. आम्ही प्राथमिक पुरावे दिले आहेत. सुनावणी वेळी आणखी पुरावे देऊ. अजित पवार गटाने खोटी कागदपत्र सादर केली", असे सिंघवी म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद आहे हे निवडणूक आयोगाने कसे ठरवले ?", असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

अजित पवार गटाला किती आमदार-खासदारांचा पाठिंबा ?

अजित पवार गटाच्यावतीने आपल्याबरोबर किती आमदार-खासदारांचे संख्याबळ आहे, याची माहिती निवडणूक आयोगात दिली. यामध्ये महाराष्ट्र विधानसभेतील 53 पैकी 42 आमदार तर विधान परिषदेतील 9 पैकी 6 आमदारही आमच्या (अजित पवार गटाच्या) बाजूने असल्याचे सांगत लोकसभेतील 5 पैकी 1 व राज्यसभेतील 4 पैकी 1 खासदार आपल्या गटात असल्याचा दावा अजित पवार गटाने निवडणूक आयोगातील युक्तिवादात केला आहे.

शरद पवारांवर अजित पवार गटाचा आरोप

"शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्या एका पत्राने नियुक्त्या होतात. हा मनमानी कारभार असून हे लोकशाहीला धरून नाही", असा गंभीर आरोप सुनावणी दरम्यान अजित पवार गटाने केला.

शरद पावर गटाने काय युक्तिवाद केला ?

निवडणूक आयोगासमोर शरद पवारांकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. त्यामुळे सर्व अधिकार शरद पवारांकडे आहेत. पण एक गट आम्हाला सोडून बाहेर पडला. मात्र, मूळ पक्ष आमचाच, असा दावा शरद पवारांच्या बाजूने करण्यात आला.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT